नागपूर/पुणे ः सूर्य आग ओकू लागल्यामुळे संपूर्ण देशासह राज्यात उष्णतेची लाट तीव्र झाली आहे. सोमवारी 46.9 अंश सेल्सिअससह राजस्थानातील बाडमेरला मागे टाकून अकोला हे देशातील सर्वाधिक उष्ण शहर ठरले. हा प्रकोप गेल्या 30 दिवसांपासून सुरू असून तो मंगळवारीही तसाच सुरू राहणार आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्ते निर्मनुष्य असल्याने अघोषित संचारबंदीसारखी परिस्थिती दिसून येत आहे.
दरम्यान, उष्माघातामुळे राज्यात दोन आणि ओडिशातही दोन अशा एकूण चौघांचा मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर होरपळीपासून बचावासाठी राज्याच्या आरोग्य विभागाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. राज्यात प्रामुख्याने विदर्भात उष्णतेचा आगडोंब सुरूच असून, अकोल्यासह अमरावती येथील तापमान सतत दुसऱ्या दिवशी देशात सर्वाधिक 46 अंशांवर होते. मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातही पारा 43 अंशांवर गेला आहे.
जुन्नर, अहिल्यानगरात दोघांचा; ओडिशात 2 शिक्षकांचा मृत्यू
सूर्य आग ओकू लागल्यामुळे जुन्नर तालुक्यातील निमगाव सावा येथे एका शेतकरी महिलेचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी सकाळी घडली. रूपाली भाऊ गाडगे (40) असे या महिलेचे नाव आहे. तसेच अहिल्यानगरमध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला. दरम्यान, ओडिशात जनगणनेच्या कामावर असताना दोन शिक्षकांचा उष्माघाताने मृत्यू झाला.