नागपूर, पुढारी वृत्तसेवा : नागपुरात झालेल्या हिंसाचारावेळी मुख्यमंत्री पोलिसांना फोन करत होते. पण पोलीस फोन उचलत नव्हते, असे भाजपचेच आमदार सांगत होते, यातून दंगलीचे प्रायोजक कोण होते, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. राज्य टिकण्यासाठी दंगली घडवल्या जात आहेत. व या दंगलींच्या आडून महाराष्ट्र लुटला जात आहे. उद्योगपतींना जमिनी दिल्या जात आहेत, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज (दि.१६) नागपुरातील सद्भावना यात्रेच्या समारोप निमित्ताने केला. (Harshvardhan Sapkal)
संविधानाचा, शिव, शाहू, फुले, आंबेडकरांचा विचार पुढे घेऊन काँग्रेसला पुढे जायचे असून राहुल गांधी यांचे ‘मोहब्बत की दुकान’ उघडायचे आहे. आज सत्तेसाठी काही लोक भावाभावात, जातीपातीत भांडणे लावत आहेत. सत्तेसाठी अशांतता पसरवणाऱ्यांनी जाती धर्मात, भावा भावात भांडणे लावू नये, असे आवाहन देखील सपकाळ यांनी केले.
दरम्यान, विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यावेळी म्हणाले की, पुरोगामी विचाराने चालवणाऱ्या महाराष्ट्रात आग लावणारे लोक सत्तेत आहेत. औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा उकरून काढत राज्यात तेढ निर्माण करण्याचे काम केले. संविधानाची शपथ घेतलेले मंत्री जाती धर्माच्या नावाने वाद निर्माण करत आहेत. एक मंत्री मशिदीत घुसून मारण्याची धमकी देतो. पण मुख्यमंत्री त्यावर काहीच बोलत नाहीत. नागपूर हिंसाचार प्रकरणानंतर एका आरोपीच्या घरावर बुलडोझर चालवून घर पाडले. त्याप्रकरणी अधिकाऱ्यांना आता माफी मागावी लागली. सर्वोच्च न्यायालयाने महायुती सरकारचा नपुंसक सरकार असा उल्लेख केला, हे निश्चितच लाजीरवाणे आहे, असेही वडेट्टीवार म्हणाले. माजी मंत्री नितीन राऊत, सुनील केदार, माणिकराव ठाकरे, अनिस अहमद यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले.