नागपूर : पुढारी वृत्तसेवा
गेल्या 24 तासात नागपूर जिल्ह्याच्या अनेक भागात दमदार पावसाने हजेरी लावली आहे. आज (शुक्रवार) सकाळपासून अनेक सखल भागात पाणी साचल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत. नागपुरात काल रात्री नरेंद्रनगर पुलाखाली पाणी साचल्याने व एकच मार्ग सुरू असल्यामुळे नेहमीप्रमाणे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
नागपुरात आज सकाळपासून पावसाने उसंत दिली, कालच्या पावसाने उकाडा वाढविला असला तरी नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यात नांद नदीला पूर आल्यामुळे परिसरातील नदी, नाल्यांचे अनेक छोटे पूल पाण्याखाली आले आहेत. भिवापूर, चिखलापार, शिरसी यासोबतच उमरेड-हिंगणघाट मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. अनेक गावांमध्ये सखल भागात पाणी शिरल्याने नागरिक रस्त्यावर आल्याचे चित्र आहे.
अद्याप तरी कुठेही अप्रीय घटना घडल्याची माहिती नाही. मात्र, पाऊस असाच सुरू राहिल्यास आणखी काही गावात गुरेढोरे, शेतीला फटका बसू शकतो अशी भीती वर्तविली जात आहे.