नागपूर : कर्जमाफीचे खोटे स्वप्न दाखवून गद्दारी करणाऱ्या या महायुती सरकारमुळे आठ महिन्यांत तब्बल ११८३ शेतकऱ्यांनी जीवन संपवले. पश्चिम विदर्भात ७०७ तर छत्रपती संभाजीनगरमध्ये ५२० शेतकऱ्यांनी जीवन संपवले. सत्तेसाठी या सरकारने भोळ्या - भाबड्या शेतकरी बांधवांना कर्जमाफीचे आश्वासन देऊन मते मिळवली. पण शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी समिती मिळाली. एकंदरीत शेतकऱ्यांचा जीव घेतला महायुती सरकारने, असा संताप काँग्रेसचे गटनेते विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केला आहे.
अतिवृष्टीने आता शेतकरी उद्ध्वस्त झाला. हातातलं पिकं गेलं, बँका कर्ज देत नाहीत. हतबल होऊन शेतकरी टोकाचे पाऊल उचलतोय. पण सरकारला काही देणंघेणं नाही. महायुतीतील तीन पक्ष एकमेकांशी भांडतात, समाजात फुट पाडतात आणि शेतकरी मात्र मरत राहतो. हे सरकार गेंड्याच्या कातडीचं झालंय. शेतकरी मेला, कुटुंब उद्ध्वस्त झालं तरी यांना लाज नाही.
कृषी खात्यातही शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा न करता कर्मचाऱ्यांना टॅब द्यायचे का लॅपटॉप यावरून वाद सुरू आहेत. हे खाते शेतकऱ्यांसाठी काम करते का? शेतकरी जीवन संपवत आहेत यासाठी थेट जबाबदार कोण असेल तर ते म्हणजे असंवेदनशील आणि विश्वासघातकी महायुती सरकारच असा आरोप वडेट्टीवार यांनी केला आहे.