सुनील केदार यांना १५ दिवसांत लेखी उत्तर देण्याचे सहकार विभागाचे आदेश  file photo
नागपूर

सुनील केदार यांना १५ दिवसांत लेखी उत्तर देण्याचे सहकार विभागाचे आदेश

पुढारी वृत्तसेवा

नागपूर : काँग्रेसचे नेते माजी मंत्री सुनील केदार यांनी नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील १५३ कोटींच्या रोखे घोटाळ्यातील व्याजासह १४४४ कोटी वसुली संदर्भात १५ दिवसात लेखी स्वरूपात आपली बाजू मांडण्याचे आदेश सहकार विभागाने दिले आहेत. केदार यांनी न्यायालयाने दिलेल्या वसुलीच्या आदेशाविरोधात सहकार विभागात धाव घेतली होती. यापूर्वी पुढे ढकलण्यात आलेली सुनावणी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यापुढे आज बुधवारी सहकार विभागात झाली.

आता रोखे घोटाळा बाबतीत केदार यांना उत्तर सादर करावे लागणार आहे. या घोटाळ्यात ५ वर्षांची शिक्षा व पाच आरोपींना १२.५० लाख रुपयांचा दंड न्यायालयाने सुनावला असल्याने केदार यांची आमदारकी रद्द ठरविली गेली. त्यांना यापुढे निवडणूक लढविण्यास देखील प्रतिबंध करण्यात आला. दोषसिध्दीला स्थगिती न मिळाल्याने उच्च व सर्वोच्च न्यायालयात त्यांना दिलासा मिळू शकला नाही. दरम्यान, सावनेर या केदार यांच्या गृह मतदारसंघात नुकतेच भाजपने शक्तिप्रदर्शन केले. माजी आमदार डॉ. आशीष देशमुख, राजीव पोतदार यांच्या नेतृत्वाखाली ठिय्या आंदोलन करण्यात आले. केदार यांच्याकडून २ महिन्यात वसुली करून ती रक्कम पीडितांना द्यावी, या मागणीसह एनडीसीसी बँक रोखे घोटाळ्यातील सव्याज १४४४ कोटींची वसुली करण्यासाठी ठिय्या आंदोलन रविवारी तिसऱ्या दिवशी स्थगित करण्यात आले.

आशिष देशमुख यांच्या नेतृत्वात ‘वसुली यात्रा’

माजी आमदार डॉ. आशिष र. देशमुख यांच्या नेतृत्वात आता ‘वसुली यात्रा’ काढली जाणार आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेल्या आश्वासनामुळे सावनेर येथील बेमुदत ठिय्या आंदोलन तूर्तास स्थगित केल्याचे देशमुख यांनी सांगितले. नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक घोटाळा पीडित शेतकरी व खातेदार संघटना, सावनेरतर्फे हे आंदोलन करण्यात आले. विविध भाजप नेत्यांनी यात सहभागी होत समर्थन दिले. जेएन पटेल कमिटीसमोर ज्यांचे पैसे बुडाले त्या शेतकऱ्यांचे व खातेदारांचे अर्ज गेले पाहिजेत. हे अर्ज घरोघरी जाऊन गोळा करा. नागपूर जिल्ह्यात फिरून आणि ‘वसुली यात्रा’ काढून अर्ज जमा करण्याचा अभिनंदनीय निर्णय घेण्यात आला आहे. हे अर्ज घेऊन डॉ. आशिष देशमुख हे संविधान चौकात येतील तेव्हा मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तिथे हे अर्ज घेण्यासाठी बोलावेन, अशी ग्वाही भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आंदोलनाला भेटीत दिली.

पीडितांना न्याय द्या : डॉ. आशिष देशमुख

मागील २२ वर्षात कित्येक पिडीत शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. पगाराचे पैसे नोकरदार वर्गाला मिळाले नाहीत. कित्येक मुलींची लग्न मोडली गेली. सुनील केदारांनी लोकांचे पैसे लुटले. त्यांच्या दहशाहीमुळे लोक बोलत नाहीत. ग्रामीण भागाला चालना देणाऱ्या जिल्हा परिषदेचे पैसे सुद्धा यात अडकले. सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील वसुली करण्यासाठी टाळाटाळ करत आहेत. कारण त्यांचे केदारांशी हितसंबंध आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यात लक्ष घालून पीडितांना न्याय देण्याची गरज आहे, अशी मागणी डॉ. आशिष देशमुख यांनी यावेळी केली. आंदोलनात आमदार टेकचंद सावरकर, सुधीर पारवे, सुधाकर कोहळे, मनोहर कुंभारे, संध्या गोतमारे, प्रकाश टेकाडे, सुधाकर मेंघर, ओमप्रकाश कामडी, नरेश मोटघरे, शेषराव चाफले, आनंदराव राऊत, प्रफुल्ल मोहोटे आदी सहभागी झाले होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT