नागपूर - नागपुरातील दंगलग्रस्त भागातील नेमकी स्थिती जाणून घेण्यासाठी आणि शांततेचे आवाहन करण्यासाठी प्रदेश काँग्रेसची समिती गठित करण्यात आली असून ती नागपूरच्या दंगलग्रस्त भागात जाऊन पाहणी करणार आहे. स्थानिकांशी चर्चा करून शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
नागपुरमध्ये सोमवारी रात्री हिंसक घटना घडल्याने महाराष्ट्राच्या लौकिकाला काळीमा फासला आहे. दगडफेक आणि जाळपोळीची घटना अत्यंत दुर्दैवी असून महाराष्ट्रातील शांतता भंग करण्याचा काही शक्ती प्रयत्न करत आहेत. आज महाराष्ट्रातील शांतता व सामाजिक सौहार्द टिकवणे गरजेचे असल्यामुळेच प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या निर्देशानुसार ही समिती गठीत करण्यात आली आहे.
या समितीत माजी प्रांताध्यक्ष गोव्याचे प्रभारी माणिकराव ठाकरे, माजी खासदार हुसेन दलवाई, माजी मंत्री डॉ. नितीन राऊत, ॲड. यशोमती ठाकूर, आ. साजिद पठाण हे या समितीचे सदस्य असून नागपूर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार विकास ठाकरे हे निमंत्रक तर अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव प्रफुल्ल गुडघे पाटील समन्वयक आहेत.काँग्रेसची ही समिती दंगलग्रस्त भागात जाऊन परिस्थितीची पाहणी करेल व शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करेल अशी माहिती प्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन ॲड. गणेश पाटील यांनी दिली.