नागपूरः अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रमुख प्रा. श्याम मानव यांच्या रेशीमबागेतील सुरेश भट सभागृहात बुधवारी (दि.16) सायंकाळी झालेल्या जाहीर व्याख्यान कार्यक्रमात भाजयुमोने चांगलाच गोंधळ घातला. भाजपनेते देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केले जात असून संविधान बदलण्याच्या अफवांनी जनते संभ्रम निर्माण केला जात आहे. संविधान विरोधकांना मतदान करू नका,केवळ काँग्रेसला मतदान करा असे आवाहन केले जात असून राजकारण करण्यासाठी ही सभा असल्याचा आरोप करीत बराच वेळ घोषणायुद्ध दोन्ही बाजूने सुरू होते.
अखेर पोलीस सभागृहात आले त्यांनी दोन्ही बाजूने कार्यकर्त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला मात्र बराच वेळ वातावरण तापलेले होते. विशेष म्हणजे हा गदारोळ सुरू झाला तोवर प्राध्यापक शाम मानव यांचे व्याख्यान सुरू व्हायचे होते.ज्येष्ठ विचारवंत दशरथ मडावी बोलत असताना भाजपच्या शिवानी दानी यांच्या नेतृत्वात कार्यकर्ते आतमध्ये शिरले, गदारोळात माईक खाली पडले. समर्थकही एकदम आक्रमक झाले. जनतेची दिशाभूल करणारा हा कार्यक्रम आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना पराभूत करणाऱ्या, विरोध करणाऱ्या काँग्रेसला समर्थन देण्यासाठी हा कार्यक्रम आहे. 2019 पासून कुठले संविधान बदलले असा सवाल या मंडळींनी उपस्थित केला. जय भीम, डॉ आंबेडकर यांचा विजय असो...अशा घोषणा भाजप कार्यकर्ते देत होते.
दरम्यान, दुसरीकडे स्टेजवर शरद पाटील व इतर मान्यवर सोबत बसून असलेले प्राध्यापक शाम मानव यांनी आपल्याला अशा सर्व प्रकारांची, गोंधळाची सवय आहे.मात्र ज्या नागपूरमध्ये वेगवेगळे विचारांचे लोक राहतात. त्या सर्वधर्म समभाव असणाऱ्या नागपुरात संविधान धोक्यात आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. कितीही गोंधळ घातला तरी मी बोलणारच असे माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.