नागपूर : अशोक खरातप्रकरणी पोलिस पारदर्शी पद्धतीने तपास करीत आहेत. योग्यरित्या तपास पुढे जात असून कुणाला पोलिसांनी समन्स पाठविला म्हणजे गुन्हा सिद्ध किंवा दोषी होत नाही. यामुळे काही मोठा भूकंप होत नाही. अनेकांना असे चौकशीसाठी बोलावले जाते. तो नियमित तपासाचा, चौकशीचा भाग असतो अशी प्रतिक्रिया महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
भोंदूबाबा अशोक खरात याला पोलिसांनी तपासात सहकार्य करीत नसल्याने कोठडी वाढवून मागितली. न्यायालयाने 1 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी वाढविली. दुसरीकडे राज्य महिला आयोगाच्या, प्रदेश राष्ट्रवादी महिला काँग्रेस अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना देखील एसआयटीकडून आज समन्स बजावले गेले आहेत. शिवनिका ट्रस्टच्या आजी, माजी सदस्यांना चौकशीसाठी बोलावले जाणार असल्याच्या संदर्भात छेडले असता बावनकुळे म्हणाले, पोलिस तपासाचा भाग म्हणून कुणालाही समन्स पाठविला जाऊ शकतो. पोलिस चौकशीत तथ्य आढळल्यास पुढील कारवाई केली जाते. अन्यथा सोडून दिले जाते. यामुळे हे समन्स बाब फारशी गंभीर बाब नाही.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणबाबतीत भाजपचा कुठलाही दबाव नाही. भाजप आपल्या पक्षातील घडामोडींवर लक्ष ठेवून आहे. त्यांचा पक्ष त्यांचे निर्णय घेईल असेही बावनकुळे यांनी स्पष्ट केले. आमदार सुनील शेळके यांनी आज उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वात विलीनीकरण व्हावे अशी इच्छा व्यक्त केल्यानंतर यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गटातून उलट सुलट प्रतिक्रिया आल्या हे विशेष. माजी मंत्री अनिल देशमुख यांनी तूर्त यासंदर्भात आमच्या पक्षात कुठलीही चर्चा नसल्याचे सांगितले.