नागपूरः भविष्याचा कोणताही ठोस वेध न घेता, महाराष्ट्र आणि विशेषतः विदर्भाच्या पदरात काहीही ठोस पडलेले नाही. विदर्भातील सिंचन प्रकल्प, रखडलेले रेल्वे मार्ग आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर या बजेटमध्ये कोणतीही विशेष तरतूद करण्यात आलेली नाही. नागपूर मेट्रोच्या नावाखाली केवळ घोषणांचा पाऊस पाडला जात आहे, पण सामान्य जनतेच्या खिशाला परवडणारे काहीही यात नाही. कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या मालाला रास्त भाव मिळावा, यासाठी कोणतीही हमी या सरकारने दिलेली नाही. स्वयंपाकाच्या गॅसपासून ते जीवनावश्यक वस्तूंच्या किमतींवर सरकारचे कोणतेही नियंत्रण नाही असा आरोप माजी मंत्री राष्ट्रवादी काँग्रेस शप गट रमेशचंद्र बंग यांनी केला.
महाराष्ट्राच्या विकासाला गती देणारा अर्थसंकल्प -चंद्रशेखर बावनकुळे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला केंद्रीय अर्थसंकल्प महाराष्ट्राच्या विकासाला गती देणारा आणि भविष्योन्मुख असल्याची प्रतिक्रिया महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. रेल्वे, रस्ते, उद्योग, कृषी, आरोग्य, शिक्षण आणि महिला सक्षमीकरण अशा विविध क्षेत्रांसाठी करण्यात आलेल्या भरीव तरतुदींमुळे महाराष्ट्राच्या सर्वांगीण प्रगतीला नवी दिशा मिळणार आहे. राज्यातील रेल्वे प्रकल्पांसाठी मंजूर करण्यात आलेला २३,७७८ कोटींचा विक्रमी निधी, मुंबई–पुणे हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर, तसेच अमृत भारत स्थानक योजनेअंतर्गत १३२ स्थानकांचा पुनर्विकास हे राज्याच्या पायाभूत सुविधांसाठी महत्त्वाचे ठरणार आहे. हा अर्थसंकल्प आत्मनिर्भर, समृद्ध आणि विकसित महाराष्ट्राच्या दिशेने टाकलेले ठोस पाऊल आहे.
विकसित भारताकडे दमदार पाऊल - जयदीप कवाडे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘विकसित भारत’ या दीर्घकालीन संकल्पनेला मूर्त स्वरूप देणारा, देशाच्या सामाजिक व आर्थिक प्रगतीचा मार्ग स्पष्ट करणारा अर्थसंकल्प आहे, असे मत पीपल्स रिपब्लिकन पार्टी (पीरिपा) चे राष्ट्रीय कार्याध्यक्ष तसेच महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळाचेउपाध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) जयदीप कवाडे यांनी व्यक्त केले. कृषी पायाभूत सुविधा, प्रक्रिया उद्योग, साठवण व्यवस्था आणि बाजारपेठेच्या बळकटीकरणावर दिलेला भर शेतकऱ्यांना आत्मनिर्भर बनवण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल आहे. तसेच कौशल्य विकास, नवउद्योजकता आणि आधुनिक तंत्रज्ञानावर केंद्रित केलेल्या योजना देशातील तरुणांना रोजगारक्षम बनवतील. विकसित, आत्मनिर्भर आणि समृद्ध भारताच्या दिशेने टाकलेले हे ठोस पाऊल आहे.
भविष्यवादी, संवेदनशील व महत्त्वाकांक्षी अर्थसंकल्प - आमदार डॉ आशिष देशमुख
हा भारताच्या विकासाच्या दृष्टीने फ्युचरिस्टिक (भविष्यवादी), संवेदनशील व महत्त्वाकांक्षी अर्थसंकल्प असून ग्रामीण क्षेत्र, महिला सशक्तिकरण, होतकरू युवक व शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आणलेला ऐतिहासिक असा अर्थसंकल्प आहे. हा अर्थसंकल्प म्हणजे सशक्त व विकसित भारतासाठी मजबूत अर्थव्यवस्थेचे द्वार असल्याचे भाजप आमदार डॉ आशिष देशमुख यांनी म्हटले आहे.शेती व्यवसाय, डेअरी, मत्स्यपालन, पशुपालन व्यवसायाला प्राथमिकता, मेडिकल हब, पर्यटन, खेलो इंडिया, टॅक्समध्ये सूट, सेमीकंडक्टर, टेक्स्टाईल सेक्टर, हायटेक टूल्स, इन्फ्रास्ट्रक्चर मजबुती, शहरी विकासावर भर यामुळे हे बजेट विकसित भारताची गती वाढवणार आहे.