नागपूर : गंगेत स्नान केल्याने या देशातील गरिबी दूर होईल का? असा निर्बुद्ध पण तेवढाच संतापजनक प्रश्न काँग्रेसअध्यक्षानी उपस्थित केला आहे. खरगे यांच्या या विधानाचा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी निषेध केला आहे.
काँग्रेसने कायमच हिंदू धर्मियांच्या अस्मिता, श्रद्धा व भावनेचा अनादर केला. यावेळी, महाकुंभमेळा सारख्या पवित्र उत्सवाची, त्यात आस्थेने, श्रद्धेने सहभागी होणाऱ्या कोट्यवधी हिंदूंची, गंगेच्या पवित्रतेची अक्षरशः खिल्ली उडवून या सगळ्यावर कळस काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी चढवला आहे.
एका विशिष्ट समुदायाचे काँग्रेसने आजवर लांगुलचालन केले. या देशात बहुसंख्य व सहिष्णू असलेल्या हिंदू समाजाने हे शांतपणे सहन केले व स्वीकारले. परंतु, हे करीत असताना हिंदूंच्या आस्थांची खिल्ली उडवण्याचा अधिकार काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांना कोणी दिला? काँग्रेसला हिंदूंची मते हवी असतात, पण मग हिंदूंचा तुम्हाला इतका तिरस्कार का आहे? नेमकी हिंदूंची चूक तरी काय आहे? स्वतंत्र भारताच्या इतिहासात सहा दशकाहून अधिक काळ तुम्हाला सत्तेत बसवलं, ही या देशातील हिंदूंची चूक आहे का? लोकसभेत ९९ का होईना पण खासदार निवडून आणू शकलात त्या हिंदूंच्या भावनांचा आपण सन्मान करू शकत नसू तर किमान खिल्ली उडवून अपमान तरी करू नये, इतकेही भान तुम्हाला का असू नये? अशी टिकाही बावनकुळे यांनी केली.
या देशातील जनतेने सलग तीन वेळा स्पष्टपणे नाकारून देखील काँग्रेस पक्षाला शहाणपण येत नसेल तर या पक्षाला जनतेने नेमकी शिक्षा तरी काय द्यावी ? अर्थात या देशातील सुज्ञ जनता याचा निश्चित विचार करेल. परंतु, आज सत्ता नसतानाच काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष कुंभमेळ्याची खिल्ली उडवत आहेत. उद्या चुकून यांची देशात सत्ता आली, तर भविष्यात होणाऱ्या कुंभमेळ्यावर बंदी घातल्याशिवाय हे राहणार नाहीत, ही भीती आज या देशातील हिंदू धर्मियांच्या मनात निर्माण झाली आहे असे बावनकुळे यांनी म्हटले आहे.