नागपूर; विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्या संदर्भात भाजप, शिवसेना नेत्यांनी केलेली विधाने ही सहज आलेली नसून, ही बोलण्याची हिंमत त्यांच्यात आली कशी?, यामागे खरा चेहरा भाजपचाच आहे असे प्रश्न करत, काँग्रेस आमदार विकास ठाकरे यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा गप्प का? देशात दंगल, अराजकता पसरवण्याचा हा डाव असल्याचा थेट आरोप काँग्रेसचे शहराध्यक्ष आमदार विकास ठाकरे यांनी केला.
आज नागपुरात काँग्रेसने डॉ. अनिल बोडे, आमदार संजय गायकवाड यांच्यासह इतर बेताल वक्तव्य करणाऱ्यांवर गुन्हा, अटक करावी या मागणीसाठी आंदोलन केले. तसेच काळे फासण्याचा इशाराही दिला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या शुक्रवारी 20 सप्टेंबर रोजी वर्धा येथे येत आहेत. लोकसभा निवडणुकीपूर्वी देखील ते आले होते यावेळी पुन्हा एकदा खोटी आश्वासने ते जनतेला देतील असा आरोप पत्र परिषदेत ठाकरे यांनी केला. यावेळी महाराष्ट्रातील तसेच विदर्भातील 19 प्रश्न त्यांनी उपस्थित केले. त्या प्रश्नांची उत्तरे मोदी यांनी या दौऱ्यात द्यावीत असे आवाहन आमदार ठाकरे यांनी केले.
दरम्यानच्या काळात 18 हजार कोटी रुपयांचा बुटीबोरी येथील सोलर पॅनल प्रकल्प गुजरातमध्ये नेण्यात आला असून, विदर्भातील तीन हजार तरुणांना रोजगारापासून वंचित ठेवले आहे. विदर्भातील तरुणांची बेरोजगारीतून सुटका कधी होणार ? नागपुरात 9 वर्षाच्या मुलीवर तिच्या पाच वर्षाच्या बहिणीसमोर बलात्कार झाला अद्याप कोणाला अटक करण्यात आलेली नाही. नागपुरात 2023 मध्ये अशी 287 प्रकरणे समोर आली असताना गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नगरीत लाडक्या बहिणीचे संरक्षण कसे केले जात आहे.
विदर्भात 2023 मध्ये 1439 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. कृषी विरोधी सरकार सोयाबीन कापूस आणि संत्रा शेतकऱ्यांसाठी आयात निर्यात नियम आणि हमीभाव यासारख्या न्याय धोरणांचे अंमलबजावणी कधी करणार?, महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याचे दिलेले आश्वासन कधी पूर्ण होणार, गडचिरोली, अमरावतीमध्ये आरोग्य सेवेअभावी झालेले मृत्यू खारपाणपट्ट्याकडे दुर्लक्ष, समृद्धी महामार्ग प्रकल्पाला तडे, नागपूर मेट्रो उद्घाटनाला दशक उलटले असले तरी योजना अपूर्ण आहे. कॅगने ताशेरे ओढले, वर्धा येथील बजाज चौकातील रेल्वे पुलाचे काम अपूर्ण आहे अशा विविध प्रश्नांकडे यावेळी आमदार ठाकरे यांनी लक्ष वेधले.
राज्यातील महायुतीचे सरकार अपयशी ठरले असून, गृह खातेच काय कुठल्याही खात्याविषयी जनतेत समाधान नाही. उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आज केलेले दावे म्हणजे अपयश लपवण्याची खोटी धडपड असल्याचा दावा केला, समोरासमोर कागदपत्रासह बोलण्याची आपली तयारी असल्याचा इशारा यावेळी विशाल मुत्तेमवार, ठाकरे यांनी दिला. निवडणुकीच्या तोंडावर लाडकी बहीण योजना ही महिलांना लॉलीपॉप दाखवण्याचा प्रकार असून ही योजना किती दिवस सुरू राहील असा महिलांमध्येच संशय आहे याकडे लक्ष वेधले.यावेळी आमदार अभिजीत वंजारी, संजय महाकाळकर, प्रशांत धवड, अतुल कोटेचा आदी उपस्थित होते.