पुढारी ऑनलाईन डेस्क : बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh Murder Case) यांच्या हत्येचे प्रकरण अतिशय गंभीर आहे. या ह्त्येची पाळेमुळे शोधावी लागतील. बीडमधील कायदा व सुव्यवस्था बिघडलेली आहे. बीडचे गंभीर चित्र बदलायला हवे. जिल्ह्यातील वाळू माफीया, उद्योगांना त्रास देणाऱ्यांची शोधमोहिम हातात घेऊन संघटीत गुन्हेगारी अंतर्गत कारवाई करून मकोका लावणार, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज (दि.२०) दिला. विधानसभेत त्यांनी बीड आणि परभणी घटनेवर निवेदन दिले. यावेळी ते बोलत होते. (Nagpur Winter Session)
ते पुढे म्हणाले की, बीड जिल्ह्यात अराजकतेचे राज्य तयार करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यात पोलिस प्रशासनाचाही दोष आहे. यापुढे हे सहन केले जाणार नाही. बीड जिल्ह्यात असे करणाऱ्यांची पाळेमुळे खणून काढली जातील. प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संघटीत गुन्ह्याचा भाग समजून मकोकात टाकले जाईल. आयजी दर्जाच्या अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली एसआयटीकडून चौकशी केली जाईल. या गुन्ह्यामागे कुणीही असला तरी कारवाई केली जाईल. वाल्मिकी कराड यांचा या गुन्ह्यात सहभाग असल्याचे पुरावे मिळाल्यास त्यांच्यावरही कारवाई होईल. कंपनीच्या फिर्यादीत कराड याने धमकी दिल्याचा आरोप केला आहे. कराड यांच्यासोबत कुणाचाही फोटो असू दे, याचा विचार केला जाणार नाही.
बीड जिल्ह्यात गंभीर गुन्हे करणाऱ्यांची पाळेमुळे खणून काढून त्यांच्यावर मकोका लावू, असा इशाराही दिला. तसेच तीन ते सहा महिन्यांत तपास करून कारवाई केली जाईल, असे फडणवीस यांनी सभागृहाला आश्वस्त केले.