Aruna Sabane on Captain Ashok Kharat Nashik
नागपूर : भोंदू अशोक खरातच्या नादाला स्वतःहून लागणाऱ्या, त्याच्या आदेशाचे व्यक्तिगत सुखासाठी पालन करणाऱ्या महिलांवर कारवाई व्हावी, महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचा राजीनामा घेऊन चालणार नाही, त्यांनी अनेक महिलांना त्यांच्याकडे नेल्याची माहिती वाचनात आल्याने त्यांच्यावरही कडक कारवाई व्हावी, अशी मागणी ज्येष्ठ साहित्यिक, महिलांसाठी काम करणाऱ्या समाजसेविका अरुणा सबाने यांनी राज्य सरकारकडे केली आहे.
यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र पाठविले आहे. आतापर्यंत जे काही खरात पीडित महिलांचे फोटो, व्हिडिओ समोर आले आहेत त्यामध्ये कुणी ग्रामीण, अशिक्षित महिला नाहीत. सुशिक्षित, उच्चवर्गीय महिला असून अनेक महिला त्यांच्या या गैरकृत्याचा विरोध करण्याऐवजी भोंदूबाबा खरात यांच्या निर्देशांचे पालन स्वेच्छेने करताना दिसत आहेत.
गुंगीचे औषध दिल्यावर कुणी असे वागू शकत नाही. मुळात योनी शुद्धीकरण वगैरे हा फालतूपणा आहे. याला कुठलाही आधार नाही. खरेतर तीर्थ, गंडे धागेदोरे यामुळे मूल होत नाही. याबाबतीत आम्ही सामाजिक क्षेत्रात काम करणारे लोक, अंधश्रद्धा निर्मूलन समिती सातत्याने काम करीत आहे. मात्र, अजूनही हे चित्र समाजात मोठ्या प्रमाणात कायम आहे.
यापुढील काळात अशा भोंदूबाबा, पीडित महिलांना न्याय मिळावा, कुणी आणखी महिला अशा पद्धतीने लुबाडल्या जाऊ नयेत, ही आपली भूमिका आहे. यावर अरुणा सबाने यांनी माध्यमांशी बोलताना भर दिला. अर्थातच मुख्यमंत्री या पत्राचे काय उत्तर देतात यावर पुढील धोरण ठरणार आहे. नागपुरात आल्यावर मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याचाही आपला प्रयत्न राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.