नागपूर; पुढारी वृत्तसेवा : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी ओबीसी नेत्यांना टपकवून देण्याची, वंशावळ अर्थात खानदान संपवण्याची, राजकीय कारकीर्द संपवण्याची जाहीरपणे वापरलेली भाषा अतिशय गंभीर असून राज्य सरकार, पोलिसांनी त्याची तातडीने दखल घेत त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अटक करावी अन्यथा ओबीसी समाज त्यांच्या विरोधात राज्यभरात रस्त्यावर उतरेल, गुन्हे दाखल केले जातील असा सज्जड इशारा ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय नेते डॉ बबनराव तायवाडे यांनी दिला आहे.
ओबीसी नेत्यांना सुरक्षा देण्याची मागणी केली. जरांगे पाटील यांनी शनिवारी पत्रपरिषदेतून ही सर्व विधाने केली असल्याने राज्य सरकारने त्याची गंभीर दखल घेणे गरजेचे असल्यावर डॉ तायवाडे यांनी भर दिला. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी ते लढत असले तरी आम्ही देखील ओबीसी समाजाच्या आरक्षणासाठी संवैधानिक पद्धतीने लढत आहोत.अशावेळी धमकीवजा भाषा वापरणे, राज्य सरकारला धमकी देणे हा सर्व प्रकार गंभीर असल्याकडे डॉ तायवाडे यांनी माध्यमांशी बोलताना लक्ष वेधले. राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल नेमका काय आहे यावर बोलण्यास नकार देत याविषयी माजी न्यायमूर्ती मेश्राम यांनी व्यक्त केलेले मत देखील गंभीर आहे असे तायवाडे म्हणाले. मात्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या सदस्याला ज्या पद्धतीने बडतर्फ केले जाते त्यावरून हे सरकार मराठा समाजाला पाठीशी घालणारे, ओबीसी समाजावर अन्याय करणारे असल्याचा आरोपही यानिमित्ताने केला.मनोज जरांगे पाटील यांनी वारंवार आंदोलनाची भाषा करणे, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, विजय वडेट्टीवार, प्रकाश अण्णा शेंडगे किंवा आम्हाला देखील या प्रकारची धमकी देणे हा प्रकार ओबीसी समाज कुठल्याही परिस्थितीत खपवून घेणार नाही.
सरकारने दखल न घेतल्यास ओबीसी समाज जरांगे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी पुढाकार घेईल असा इशाराही त्यांनी दिला. मराठा समाजाला ओबोसी,एससी, एसटी शिवाय स्वतंत्र आरक्षण देण्यास आमचा विरोध नाहीच, मात्र कधी 10 तर कधी 13 टक्के असा संभ्रम निर्माण होत आहे.ओबीसीतून आरक्षण समाज सहन करणार नाही. राज्य विधिमंडळाचे अधिवेशन होत असताना वाट न पाहता याप्रकारे सरकारवर दडपण आणण्याचा जरांगे यांचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोपही तायवाडे यांनी केला.