नागपूर : भाजपनेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संस्थेला कमी रुपयात जमीन दिली असून वित्त खात्याने त्याला विरोध केला. आता दोन महिन्यात आमचेच सरकार येणार असून सरकार आले की, या प्रकरणाची चौकशी लावणार असा इशारा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी माध्यमांशी बोलताना दिला.
शेतकरी, बेरोजगारी, महागाई राज्यात असल्याने याचा मोठा फटका सरकारला बसणार आहे. राज्यात मविआचे सरकार येणार आहे. नरेंद्र मोदी, अमित शहा कितीही निवडून आले तरी त्याचा काहीही फरक पडणार नाही. मोदींनी लोकसभेत २३ सभा घेतल्या तरी त्यांचा दारुण पराभव झाला. यावेळीही १०० टक्के महाविकास आघाडी सरकार राज्यात येणार आहे. असे ते म्हणाले.
जागावाटप संदर्भात महाविकास आघाडीमध्ये अंतिम चर्चा अजून झालेली नाही, प्राथमिक चर्चा सुरू आहे, सविस्तर चर्चा करूनच निर्णय होणार आहेत. ३० सप्टेंबर आणि १ तारखेला आमची मुंबईमध्ये चर्चा आहे, त्यात विदर्भाच्या जागाबाबतीत निर्णय होईल अशी माहिती देशमुख यांनी दिली. राज्यात कंत्राटदार यांचे ७६ हजार कोटी रुपये देणे बाकी आहे. अनेक निवेदने आमच्याकडे आली आहेत. लोकांची देणी लवकर द्या ही आमची मागणी आहे.
भाजप नेते अमित शहा यांच्या दौरा यावर बोलताना लोकसभेत महाराष्ट्रमध्ये भाजपची पिछेहाट झाली. त्यामुळेच अशी वक्तव्य करावी लागत आहेत. राज्यात अनुकूल स्थिती नाही हे अमित शहा यांना देखील माहिती आहे असा टोला गृहमंत्री अनिल देशमुख यांनी लगावला.