नागपूर - आज गुरुवारी विदर्भात प्रथमच चंद्रपूरला 44.6 अंश सेल्सियस सर्वाधिक तापमानाची नोंद झाली. त्या पाठोपाठ अमरावती 44 अंश सेल्सिअस तर अकोला, नागपूर 43.6 अंश सेल्सियस तापमान होते. दिवसेंदिवस सूर्य आग ओकत असून मे सुरू होण्यापूर्वीच उन्हात नागरिकांना सावलीचा आश्रय प्यावा लागत आहे.
गेल्या दहा दिवसांमध्ये उपराजधानीत उष्माघातानमुळे १५ जणांचा मृत्यू झाला. हे संशयित उष्माघाताचे बळी असल्याचे सांगितले जात असले तरी शवविच्छेदनानंतरच त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. रिक्षाचालक, फुटपाथवरील भिक्षेकरी, पायी चालणारे ज्येष्ठ नागरिक यांचा यात समावेश होतो. गेल्या आठ दिवसांत उन्हाचा तडाखा अधिक जाणवत आहे. सोमवारपर्यंत गेल्या दहा दिवसांत मेयो रुग्णालयात पाच आणि मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये आठ अनोळखी व्यक्तीचे शवविच्छेदन करण्यात आले. सर्वाधिक मृतक हे ३० ते ५५ वयोगटातील होते.
कोतवाली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील महालमधील पुस्तक गल्ली परिसरात सायंकाळी ४५ वर्षीय इसमाचा मृतदेह आढळून आला. विदभांत मागील २४ तासांत तापमानात किंचित घट नोंदवली गेली असली, तरी विजेच्या लपंडावामुळे नागपूरकरांच्या सहनशीलतेचा अंत बघितला जात असल्याचा संताप व्यक्त होत आहे. स्मार्ट सिटीत हे अघोषित लोडशेडिंग असल्याचे बोलले जात आहे. बुधवारपर्यंत विदर्भाला यलो अलर्ट होता. आज, गुरुवारपासून विदर्भाला अलर्ट देण्यात आलेला नसल्याने काहीसा दिलासा मिळणार आहे.