नागपूर; पुढारी वृत्तसेवा : इतवारी रेल्वे स्टेशनवर टाटा इतवारी पॅसेंजर रुळावरुन घसरल्याची चर्चा होती. या दुर्घटनेत एक डबा रुळावरुन घसरला तर एका डब्याला आग लागली अशी चर्चा रंगली होती. मात्र काही वेळानंतर ही दुर्घटना एक मॉक ड्रिल असल्याची माहिती समोर आली.
इतवारी रेल्वे स्टेशवर बुधवारी (दि. ३१) रेल्वेचा एक डबा रुळावरून घसरल्याचे आणि दुसऱ्या डब्यात आग लागल्याचे चित्र पहायला मिळाले. या दुर्घटनेत तिघांचा मृत्यू तर, ३० प्रवासी जखमी झाल्याची चर्चा देखील होती. मात्र, काही वेळातच ही सर्व घटना अपघातात घ्यावयाची खबरदारी या दृष्टीने सरावाचा भाग असल्याची माहिती पुढे आली. या माहितीनंतर इतवारी रेल्वे स्थानक परिसरातील प्रवासी आणि सर्वजण रिलॅक्स झाले. सर्वकाही सुरळीत पार पडल्यानंतर प्रशासनानेही सुटकेचा श्वास घेतला.
वाढते अपघात आणि संभाव्य घटना लक्षात घेता रेल्वे प्रशासन, आरपीएफ, एनडीआरएफ, अग्निशमन यंत्रणा, स्काऊट गाईड्स आदींच्या मदतीने हा संयुक्त सराव आज करण्यात आल्याची माहिती दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापक नमिता त्रिपाठी यांनी दिली.