नागपूर; पुढारी वृत्तसेवा : बाजार समितीच्या निवडणुकीचा आगामी विधानसभेशी काहीही संबंध नाही असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. नरखेड-काटोल विधानसभा मतदार संघाचा दौरा केला. अवकाळी नुकसान भरपाईचा जो निधी आहे तो तातडीने शेतकऱ्यांपर्यंत पोहचावा यासाठी प्रयत्नशील असल्याची ग्वाही बावनकुळे यांनी दिली.
दरम्यान, आज जाहीर झालेल्या बाजार समिती निवडणूक संदर्भात विचारले असता ते म्हणाले, बाजार समिती निवडणूक पक्षीय राजकारणात होत नाही. सहकार क्षेत्रातील कार्यकर्ते एकत्र येऊन निवडणूक होतात, भाजप सेनेला काही ठिकाणी यश आले तर काही ठिकाणी स्थानिक पद्धतीने यश मिळाले आहे. काही लोक महाविकास आघाडीला यश मिळाल्याचे फटाके फोडत आहेत पण असे काही नाही, चांगले लोक निवडून आले पाहिजेत. जे निवडून आले त्यांना शुभेच्छा आहेत. मात्र, या निवडणुकीचा विधानसभेशी काही संबंध नाही. सर्व निवडणूका वेगळ्या आहेत. ही कुठलीही लिटमस टेस्ट वैगरे नाही. मुळात पहिल्यांदा सहकार खात्यात भाजप-सेनेला लढण्याची संधी मिळाली, आता शेतकऱ्यांनाही लढता येते. चांगला निर्णय सरकारने घेतला आहे. त्यामुळे यश मिळाले आहे. नाना पटोले याच्या भंडारा जिल्ह्यात राष्ट्रवादीने काँग्रेसला सोडले आहे. गोंदियात झेडपीत राष्ट्रवादी आणि भाजप एकत्र आले आहेत. वज्रमुठ सैल का सुटली याचे आत्मपरीक्षण करावे असा सबुरीचा सल्ला त्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना दिला.नितेश राणे यांना मुख्य प्रवक्ता केले आहे. संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदे संदर्भात, नितेश राणे जे बोलले असतील त्यांना त्याची पूर्ण माहिती असेल असेही ते म्हणाले.