नागपूर; पुढारी वृत्तसेवा : सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राज्याच्या अनेक भागांमध्ये पावसाने हजेरी लावल्याव पावसाने दोन ते तीन दिवसांची विश्रांती घेतली. मात्र, आता बुधवारपासून विदर्भासह राज्यात अनेक ठिकाणी पुन्हा जोरदार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आल्याने गणेशोत्सव पूर्वतयारी करणाऱ्यांना, मूर्तिकारांची चिंता वाढली आहे. बुधवारपासून पुन्हा एकदा राज्यात पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.
बुधवारी आणि गुरुवारी विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये 'यलो अलर्ट' देण्यात आला आहे. पहिल्या आठवड्यातील जोरदार पावसामुळे राज्यातील बहुतांशी भागात पिकांना मात्र जीवदान मिळाले आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये धरणे भरली आहेत. रिमझिम हजेरी सुरू असताना आता या आठवड्यात सुरु होणाऱ्या दमदार पावसामुळे पश्चिम विदर्भातील पावसाची तूट भरून निघण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.