गोंदिया, पुढारी वृत्तसेवा : जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेसह स्थायी समितीच्या सभेला अधिकाऱ्यांना आमंत्रित करूनही गेल्या अडीच वर्षात सार्वजनिक बांधकाम विभाग क्रं.१ (रोहयो) व सार्वजनिक बांधकाम विभाग क्र.२ च्या कार्यकारी अभियंत्यानी जिल्हा परिषदेच्या या दोन्ही सभांना दांडी मारले. तर आपले प्रतिनिधी न पाठविल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी जिल्हा परिषद अध्यक्ष पंकज रहांगडाले यांनी केली आहे. तर या आशयाचे पत्र त्यांनी राज्याच्या प्रधान सचिवांना व बांधकाम विभागाच्या सचिवांना पाठविले आहे.
अध्यक्ष रहागंडाले यांनी पाठवलेल्या पत्रानुसार शासनाच्या अनेक योजना जिल्हा परिषदेच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत पोहचतात. यासाठी जिल्हा परिषदेतील सर्वसाधारण सभेसह स्थायी समितीची सभा महत्वाची असते. मात्र, अनेकदा संबधित कार्यकारी अभियंत्याना सभेचे पत्र दिल्यानंतरही ते गैरहजर राहत असल्याने रस्ता बांधकामातील अनेक समस्या सोडविण्यात अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील रस्तेविकासही थांबल्याचे चित्र आहे. तेव्हा मिनी मंत्रालय असलेल्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण व स्थायी समितीच्या सभेला सतत गैरहजर राहणाऱ्या या अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. तेव्हा शासनाकडून जिप अध्यक्षांच्या या पत्राकडे किती गांभीर्याने लक्ष देते याकडे लक्ष लागले आहे.