गोंदिया : छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील शासन व्यवस्था चांगली होती. आज महाराजांचा काळ असता तर बदलापूर, कोलकाता सारख्या घटना घडल्या नसत्या. आज प्रशासनाचा धाक गुन्हेगारांवर राहिलेला नाही. त्यामुळेच कोलकाता आणि बदलापूरसारख्या घटना घडत आहेत. पुरोगामी महाराष्ट्रात अशा घटना ही येथील प्रशासनासाठी लाजिरवाणी बाब आहे, असे वक्तव्य महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर राज ठाकरे आजपासून विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. दरम्यान आज (दि. २१) ठाकरे यांनी गोंदियात मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर अमित ठाकरे, गोंदिया जिल्हा संघठक रितेश गर्ग, गोंदिया जिल्हाध्यक्ष मनिष चौरागडे, मन्नु लिल्हारे, तालुका अध्यक्ष मुकेश मिश्रा आदि उपस्थित होते.
पुढे बोलताना ठाकरे म्हणाले, प्रशासनाच्या अशा गळचेपी भुमिकेमुळेच येथील पोलिसांना आपले काम मनमोकळेपणाने करण्याची सूट राहिलेली नाही. त्यांनी इतका दबाव पोलिसांवर निर्माण केला आहे की, पोलिसांनाही वाटते काही कमी जास्त झालं की, की बळी आपलाच जाणार आहे. माझे उपस्थित पोलिसांना म्हणणे आहे की, एकदा माझ्या हातात सत्ता द्या, मग दाखवितो की कसे सरकार चालविले जाते. निगरगट्ट प्रशासनामुळे संपूर्ण देशात महाराष्ट्राची बदनामी होत आहे. पण येथील शासनाला याचं काहीही सोयरसुतक राहिलेला नाही, असेही ठाकरे यावेळी म्हणाले.