गोंदिया, पुढारी वृत्तसेवा : हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार मागील तीन दिवस जिल्ह्यात मुसळधार पाऊस आहे. मुसळधार कोसळलेल्या पावसाने विदर्भात हाहाकार माजवला आहे. तसेच गोंदिया जिल्ह्यात समाधानकारक पाऊस पडल्याने शेतकरी आणि जिल्हावासी सुखावल्याचे चित्र पहावयास मिळाले. रविवारी (दि.21) सकाळपर्यंत जोरदार पाऊस पडल्याने जिल्ह्यातील पाच तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. यावेळी जिल्ह्यातील एकूण 25 ठिकाणी महसूल अतिवृष्टी नोंदविण्यात आली.
पावसामुळे जिल्ह्यात रोवणीच्या कामांना वेग आला आहे. याबरोबरच सडक अर्जुनी, अर्जुनी मोरगाव आणि देवरी या तीन तालुक्यात सर्वदूर पाणीच पाणी असल्यामुळे रोवणीचे काम खोळंबले होते. सडक अर्जुनी, अर्जुनी मोरगाव व देवरी या तीन तालुक्यात मुसळधार पावसाने अनेक मार्गावरील पुलावरून पाणी वाहत होते. त्यामुळे मार्गावरील वाहतूकही ठप्प पडली होती. अर्जुनी मोरगाव तालुक्यातील मार्गावरील वाहतूक बंद पडून गावा-गावातील संपर्क तुटले होते. मुसळधार पावसामुळे अर्जुनी मोरगाव तालुक्यात घराची पडझडही सुरू आहे. धाबेटेकडी टेकडी येथील दिलीप मधुकर कार्णिक यांचे घर पूर्णत: पडला. त्याचबरोबर किर्ती सोनवाने, रामचंद सोनवाने यांचे घरही पावसाने क्षतिग्रस्त झाले. यामुळे कुटूंबाचे मोठे नुकसान झाले आहे. शिवाय अनेक घर व गोठे क्षतिग्रस्त होऊन नुकसान झाल्याचे दिसून आले.