गडचिरोली : शुक्रवारी (दि.२१) रात्री सिरोंचा तालुक्यात जोरदार अवकाळी पाऊस पडल्याने मिरची व कापूस या नगदी पिकांना जबर फटका बसला असून, शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे.
सिरोंचा तालुका हा गडचिरोली जिल्ह्याचे शेवटचे टोक आहे. या तालुक्यात धानपिकाबरोबरच मिरची व कापूस या पिकांचे सर्वाधिक उत्पादन घेतले जाते. यंदा शेतकऱ्यांनी जवळपास ५०० हेक्टर क्षेत्रात मिरचीची, तर दीड हजार हेक्टर क्षेत्रात कापसाची लागवड केली होती. बहुतांश शेतक-यांची तोडाई आटोपली. परंतु बाजारपेठेत मिरची व कापसाला दर कमी असल्याने अनेक शेतक-यांनी योग्य दर मिळेल, याची वाट बघत उत्पादित माल विकलाच नाही. शेतक-यांनी तोडलेली मिरची वाळविण्यासाठी शेतात ठेवली होती. कापूसही साठवणूक करुन ठेवला होता. मात्र, शुक्रवारी संध्याकाळनंतर वादळी पावसाने हजेरी लावल्याने शेतातील वाळलेली मिरची आणि कापूस भिजले. परिणामी शेतक-यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शासनाने तत्काळ पंचनामे करुन भरपाई द्यावी, अशी मागणी मिरची व कापूस उत्पादक शेतक-यांनी केली आहे.