Gadchiroli bhamragad
भामरागड तालुक्यातील भटपार या गावातील जखमी बापास कावड मधून नेताना एक तरुण  Pudhari
गडचिरोली

खाटेची बनविली कावड : जखमी बापाच्या उपचारासाठी मुलाने केली १८ किमीची पायपीट

पुढारी वृत्तसेवा
जयंत निमगडे

गडचिरोली : चांगले रस्ते आणि पुलांअभावी आदिवासींना उपचारासाठी खाटेची कावड बनवून कित्येक किलोमीटरची पायपीट करावी लागत असल्याचे विदारक दृश्य गडचिरोली जिल्ह्यात बघावयास मिळत आहे. नक्षलग्रस्त, अतिदुर्गम आणि आदिवासीबहुल भामरागड तालुक्यातील भटपार या गावातील एका माडिया जमातीच्या आदिवासी तरुणाच्या वाट्याला आलेली ही वेदना भयावह आहे.

गेल्या सहा-सात दिवसांपासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. अशातच भटपार येथील मालू केये मज्जी (वय ६७) हे शुक्रवारी (ता.२६) सकाळी शेतावर गेले असता पाय घसरुन पडले. त्यांना वेदना होऊ लागल्या. त्यानंतर मुलगा पुसू मालू मज्जी याने जखमी पित्याला भामरागड येथील रुग्णालयात नेण्याचे ठरविले. त्यासाठी त्याने खाटेची कावड बनविली. सोबत एका मित्रालाही घेतले. आपल्याला १८ किलामीटरची पायपीट करीत भामरागड गाठायचे आहे, याची त्यांना कल्पना होती.

खाटेवर झोपविलेल्या बापाला घेऊन दोघेही पुढे जाऊ लागले. वाटेत तुडुंब भरलेली नदी होती, रिमझिम पावसाचा मारा झेलत, चिखल तुडवीत दोघांनी कशीबशी नदी गाठली. तेथे असलेल्या नावेतून त्यांनी नदी पार केली आणि पुन्हा भामरागडच्या दिशेने कावड घेऊन पायपीट सुरु झाली.

दुपारी ते भामरागडच्या रुग्णालयात पोहोचले. तेथे डॉक्टरांनी मालु मज्जी यांचा पाय तुटल्याचे निदान करुन शस्त्रक्रिया करण्याची गरज असल्याचे सांगितले. त्यासाठी गडचिरोली येथील जिल्हा रुग्णालयात जाण्याचा सल्लाही दिला. हे ऐकून पुसू धास्तावला आणि पुन्हा जखमी बापाची कावड घेऊन तो भटपारच्या दिशेने माघारी फिरला.

कधी संपणार या यातना?

भामरागड तालुक्यात आजारी नागरिकांबरोबरच गरोदर महिलांनाही खाटेची कावड बनवून आणावे लागत‍ असल्याची बाब नवीन नाही. पूर्वी भामरागड तालुक्यात नक्षल्यांची प्रचंड दहशत होती. त्यामुळे रस्ते, पूल यासारखी कामे करता येत नाही, असे शासन आणि प्रशासन एक-दोन वर्षांपूर्वीपर्यंत सांगत राहिले. परंतु यंदा नक्षलवाद संपल्याचे खुद्द गृहमंत्री आणि पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले. नक्षलवाद संपला असेल तर रस्ते आणि पुलांची कामे का होत नाहीत, असा सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

SCROLL FOR NEXT