Anti Naxal Operations Maharashtra
गडचिरोली: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत देशातील माओवादी चळवळीचा अस्त झाल्याची घोषणा केल्यानंतर आज एकूण ३० लाख रुपयांचं बक्षीस असलेल्या ९ नक्षल्यांनी आज गडचिरोली पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले. पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी भारताचे संविधान देऊन त्यांचा सत्कार केला.
आत्मसमर्पण करणारे सर्व नक्षलवादी छत्तीसगडमधील इंद्रावती क्षेत्रिय समिती आणि नॅशनल पार्क क्षेत्रिय समितीत कार्यरत होते. या ९ जणांपैकी तिघे जण क्षेत्रिय समिती सदस्य होते. त्यात दसरी उर्फ पिडे सन्नू वेको (वय ३५), रामजी अडमा पोटाम ( वय ४०) व शांती वज्जा वड्डे (वय ४०) यांचा समावेश आहे. मनकू पोड्याम, सरिता वेलकम, लखमी कुंजाम, नंदे मडे, राकेश मज्जी व सुक्की कुंजाम अशी अन्य आत्मसमर्पित नक्षल्यांची नावे आहेत.
मागील महिन्यात नक्षल्यांच्या कंपनी क्रमांक १० चा कमांडर प्रभाकरला ठार केल्यानंतर सध्या गडचिरोली जिल्ह्यात ६ सशस्त्र नक्षली शिल्लक आहेत. त्यातील जयराम गावडे हा एकमेव सदस्य गडचिरोली जिल्ह्याचा रहिवासी असून, अन्य पाच जण छत्तीसगडचे रहिवासी आहेत. मात्र, त्यांच्या कुठल्याही हालचाली गडचिरोली जिल्ह्यात दिसत नाही, असे पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी सांगितलं. या नक्षल्यांनी आत्मसमर्पण करावं, अन्यथा सशस्त्र कारवाईला सामोरे जावं लागेल, असा इशारा नीलोत्पल यांनी दिला.
गडचिरोली जिल्ह्यात अलीकडच्या काही वर्षांत छत्तीसगडच्या सीमावर्ती भागात ११ पोलिस मदत केंद्रांची निर्मिती करण्यात आली. त्यामुळे जिल्ह्यात असे एकही संवेदनशील ठिकाण नाही जेथे आम्ही पोहचू शकत नाही,असं स्पष्ट करुन पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी २०२४ मध्ये पोलिसांनी उत्तर गडचिरोलीला नक्षलमुक्त केल्यानंतर २०२५-२६ मध्ये संपूर्ण जिल्हाच नक्षलमुक्त करण्याच्या अंतिम टप्प्याकडे पोहचल्याचं सांगितलं.
माओवादी कम्युनिस्ट पक्षाचा पॉलिट ब्युरो सदस्य मल्लोजुला वेणुगोपाल उर्फ भूपती उर्फ सोनू याने १५ ऑक्टोबर २०२५ रोजी गडचिरोलीत आत्मसमर्पण करणे ही बाब देशातील नक्षल निर्मुलनाचा माईल स्टोन ठरली. भूपतीच्या आत्मसमर्पणानंतर देशभरात ९४० नक्षल्यांनी आत्मसमर्पण केले. त्यात पॉलिट ब्युरो सदस्य थिप्परी तिरुपती, मल्ला राजी रेड्डी यांच्यासह अन्य नक्षल्यांचा समावेश आहे.
आजवर गडचिरोली जिल्ह्यात ७९४ नक्षल्यांनी आत्मसमर्पण केले. नक्षल्यांच्या हल्ल्यात २१४ (राज्यात २४४) जवान आणि अधिकारी शहीद झाले, तर नक्षल्यांनी ५५९ (राज्यात ६०२) सामान्य नागरिकांची हत्या केली.