गडचिरोली: जिल्ह्यात मुबलक प्रमाणात आढळणाऱ्या हिरव्या बांबूवर प्रक्रिया करुन त्यापासून टाईल्स आणि अन्य उत्पादने तयार करणारा सहकारी तत्वावरील देशातील पहिलाच पायलट प्रोजेक्ट गडचिरोलीत साकारला आहे. या कारखान्यातील उत्पादने देशातील विविध राज्यासंह तैवानसह अन्य देशांमध्येही पोहचणार आहेत.
गडचिरोलीचे माजी आमदार डॉ.नामदेव उसेंडी यांनी गडचिरोली जिल्हा आदिवासी बांबू प्रक्रिया सहकारी संस्था स्थापन करुन दहा वर्षांपूर्वी बांबूपासून विविध उत्पादने तयार करण्याचा प्रकल्प तयार केला. २०१४ मध्ये त्याला राज्य आणि केंद्र सरकारने मान्यता दिली. विविध टप्प्यांमध्ये या प्रकल्पाला १९ कोटी ४० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला. या निधीतून गडचिरोली शहरातील कोटगल मार्गावरील औद्योगिक विकास महामंडळाच्या ५ एकर जागेवर हा प्रकल्प उभा राहिला. त्यातील एक जागेवर कारखान्याचे पक्के बांधकाम करण्यात आले आहे. मागील आठवड्यात या कारखान्यातून बांबूवर प्रक्रिया करुन वॉल टाईल्स, रुफ टाईल्स, फलोरिंग टाईल्स, पॅनल बोर्ड आणि अन्य वस्तू तयार करण्यास सुरुवात झाली आहे.
या प्रकल्पासाठी तैवान येथील चिनफू इंडस्ट्रीज या कंपनीकडून यंत्रसामुग्री आणण्यात आली. २०१५ मध्ये यंत्रसामुग्री आणण्यात आली आणि शेडही तयार करण्यात आले. परंतु वित्तीय सहायतेमुळे हा प्रकल्प सुरु होण्यास विलंब झाला. अखेर त्याला मूर्त रुप आले आहे. विशेष म्हणजे चिनफू कंपनीने या कारखान्यातील उत्पादने स्वत:च खरेदी करण्याचा करार केला आहे. त्यामुळे आदिवासीबहुल जिल्ह्यातील बांबू उत्पादने आता साता समुद्रापलीकडे पोहचणार आहेत.
हा बांबू प्रकल्प सहकार तत्त्वावरील देशातील पहिलाच प्रकल्प आहे. या कारखान्यात तयार होणाऱ्या टाईल्स आणि अन्य वस्तू पूर्णपणे उधळीमुक्त आहेत. या उद्योगासाठी दररोज ६०० नग आणि वर्षांला अडीच ते तीन लाख हिरवा बांबू लागणार आहे. प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरु झाल्यास तीन पाळ्यांमध्ये विविध उत्पादने तयार होतील आणि ७०० जणांना प्रत्यक्ष रोजगार मिळेल, असे गडचिरोली जिल्हा आदिवासी बांबू प्रक्रिया सहकारी संस्थेचे अध्यक्ष डॉ.नामदेव उसेंडी यांनी सांगितले. महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना अडीच हेक्टरवर बांबू लागवड केल्यास ७ लाख रुपयांचे अनुदान देण्यात येते. या योजनेच्या अनुषंगाने आपण शेतकऱ्यांना बांबू लागवडीसाठी प्रोत्साहन देणार असल्याचे डॉ.उसेंडी म्हणाले.
या प्रकल्पात सामान्य नागरिकांसह आत्मसमर्पित नक्षलवादी आणि नक्षल पीडितांनाही रोजगार मिळाला आहे. त्यांना तैवान येथील चिनफू अधिकाऱ्यांनी प्रशिक्षण दिले आहे. त्यामुळे कधीकाळी बांबूच्या हिरव्या गर्द झाडीतून बंदूक चालविणाऱ्या आत्मसमर्पित नक्षलींना आता बांबूवर प्रक्रिया करण्याची संधी मिळाली आहे.
हिरव्या बांबूपासून टाईल्स बनविण्यासाठी त्याला विविध प्रकारच्या प्रक्रियांमधून जावे लागते. क्रॉस कटिंग, एक्सर्टनल नॉट रिमुव्हींग, स्प्लीटींग, इंटरनल नॉट रिमुव्हींग, केमिकल प्रोसेस, ड्रायर, कार्बोनायझेशन, फोरसाईड प्लेनिंग, लॅमिनेशन, हॉट प्रेस, स्मूथींग अँड फिनिशिंग इत्यादी प्रक्रिया केल्यानंतरच शेवटचं उत्पादन तयार होते, असे कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक वाढिवा यांनी सांगितले.