गडचिरोली : वाघ आणि बिबट्याची शिकार करून त्यांचे कातडे व इतर अवयवांची विक्री करण्याच्या प्रयत्नात असलेल्या टोळीला गडचिरोली जिल्ह्यातील कोरची तालुक्यातून जेरबंद करण्यात गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी येथील वनविभागाच्या अधिकाऱ्यांना यश आले आहे.
सडक अर्जुनी वनपरिक्षेत्रात वाघ आणि बिबट्याच्या कातड्यासह इतर अवयवांची विक्री करणारी टोळी सक्रिय असल्याची माहिती नागपूर येथील विभागीय वनाधिकारी (सतर्कता) पी.जी.कोडापे यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी गोंदिया वनविभागाला सतर्क केले. त्याच आधारे नकली ग्राहक पाठवून तीन आरोपींना १९ फेब्रुवारीला अटक करण्यात आली होती.
त्यांच्याकडून वाघ आणि बिबट्याच्या मिशा, दोन दात, तसेच उदमांजराचे कातडे आणि एक गावठी पिस्तुलही जप्त करण्यात आले होते. त्या आरोपींनी हे साहित्य मिळवण्यात कोरची तालुक्यातील आरोपींचा हात असल्याचे सांगितल्यानंतर सडक अर्जुनीच्या चमुने कोरची तालुक्यातील नकुल प्रल्हाद शहारे (58) रा.कोहका आणि जितेंद्र गोविंदराव कराळे (30) या दोघांना ताब्यात घेतले. यावेळी त्यांच्याकडून बिबट्याचे कातडे जप्त करण्यात आले. यानंतर त्यांना कोरची तालुक्यातील बेळगाव वनपरिक्षेत्राधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आले. न्यायालयाने त्यांना 7 दिवसांची वनकोठडी दिली.
दरम्यान त्यांच्याकडून कोरची तालुक्यातील आणखी तिघांची नावे समोर आली. त्यापैकी इंदर रामदास सहारे (रा.गहाणेघाटा) आणि महेंद्र रामनाथ सहारे (रा.कोहका) यांना शनिवारी ताब्यात घेण्यात आले. आणखी एका आरोपीचा शोध सुरू आहे.
वडसा वनविभागाचे उपवनसंरक्षक वरूण बी.आर.यांनी शनिवारी बेळगावला भेट देऊन प्रकरणाची सखोल माहिती घेतली. वाघ आणि बिबट्याची शिकार नेमकी कोणी, कुठे आणि केव्हा केली, याविषयीची माहिती तपासात पुढे येईल. या तस्करीचे रॅकेट कुठपर्यंत पसरले आहे, याचाही शोध वनविभागाचे अधिकारी घेत आहेत.