Shetkari Kamgar Paksha protest
गडचिरोली : संजय गांधी, श्रावणबाळ व इतर निराधारांच्या अर्थसाहाय्य योजनांची रक्कम मासिक ५ हजार रूपये करण्यात यावी या प्रमुख मागणीसाठी शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा सचिव रामदास जराते यांच्या नेतृत्वात गडचिरोली येथील तहसील कार्यालयासमोर शेकडो निराधार नागरिकांनी ठिय्या आंदोलन केले.
या आंदोलनात भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव कॉ.देवराव चवळे,मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष कॉ.अमोल मारकवार, आझाद समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष राज बन्सोड, शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्या जयश्री जराते, जिल्हा खजिनदार भाई शामसुंदर उराडे, जिल्हा समिती सदस्य डॉ.गुरूदास सेमस्कर,भटके-विमुक्त आघाडीचे जिल्हाध्यक्ष डंबाजी भोयर, शेतकरी आघाडीचे जिल्हाध्यक्ष गोविंदा बाबणवाडे,आदिवासी आघाडी जिल्हाध्यक्ष रामदास आलाम, चंद्रकांत भोयर प्रामुख्याने उपस्थित होते.
श्रावणबाळ निराधार, वृध्दापकाळ, संजय गांधी निराधार व विधवा परितक्त्या लाभार्थींचे अर्थसाहाय्य मागील सहा महिन्यांपासून वेळेवर देण्यात आलेले नाही, ते तातडीने देण्यात यावे, हजारो लाभार्थी पात्र असूनही या योजनांचा लाभही मिळाला नाही, त्यांना योजनेचा तातडीने लाभ देण्यात यावा, रोजगार हमी योजनेची मजुरीसुध्दा वेळेवर देण्यात यावी,शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सन्मान योजनेचे अनुदान तातडीने देण्यात यावे, धान बोनस शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावा, गडचिरोली शहरातील संघर्षनगर, इंदिरानगर, शाहूनगर, गोकुळनगर, विवेकानंदनगर, विसापूर भागातील शासकीय जागेवर अतिक्रमण करून घरे बांधणाऱ्या नागरिकांना घराचे कायमस्वरूपी पट्टे देऊन नगरपरिषदेतर्फे घरकूल योजनेचा लाभ देण्यात यावा अशा विविध मागण्यांचा यात समावेश होता.
वयोवृध्द, विधवा, परितक्त्या, निराधार नागरिकांविषयी शासन असंवेदनशील भावनेने काम करत असून, हा अन्याय दूर करण्यासाठी शेतकरी कामगार पक्ष आणि डाव्या पक्षांच्या वतीने संपूर्ण राज्यभरात निराधारांच्या न्यायासाठी चळवळ उभी करु, असा इशारा शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई रामदास जराते यांनी दिला.
ठिय्या आंदोलनाच्या ठिकाणी येऊन नायब तहसीलदार हलमारे यांनी मागण्यांचे निवेदन स्वीकारले. या आंदोलनात शेतकरी कामगार पक्षाचे पदाधिकारी योगाजी चापले, देवेंद्र भोयर, भास्कर ठाकरे, विलास भोयर, महागू पिपरे, छाया भोयर, रजनी खैरे, संगीता चांदेकर,आझादचे पदाधिकारी सतीश दुर्गमवार यांच्यासह शेकडो निराधार महिला सहभागी झाल्या होत्या.