गडचिरोली : लग्न आटोपून वऱ्हाड्यांना परत घेऊन जाणारी स्कार्पिओ आणि ट्रॅव्हल्स यांच्यात झालेल्या भीषण अपघातात ५ जण ठार, तर ११ जण जखमी झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. ही घटना रविवारी (दि.२९) संध्याकाळी पावणेसातच्या सुमारास चामोर्शी-गडचिरोली मार्गावरील कुरुड-कढोली गावादरम्यानच्या नाल्याजवळील वळणावर घडली. जखमींना गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अनिकेत बर्लावार (२६, रा. भाडभिडी, ता. चामोर्शी), आरोही मोगरकर(८, रा . गट्टेगुडा), सुमन गव्हारे (६०, रा. कुनघाडा), विमलाबाई गव्हारे (६०, रा. कुनघाडा) अशी मृतांची नावे असून आणखी एकाचे नाव समजू शकले नाही. तर गुरुदेव कुनघाडकर (६०, रा. भाडभिडी), सुधाकर कुनघाडकर (६०, रा.भाडभिडी), वेदांत वैरागडे(२२, रा. भाडभिडी), प्रतिमा मानमुडकर (३५, रा. गिलगाव), निखिल दराडे (वय १७, रा. भाडभिडी), संजय वैरागडे (१७, रा. भाडभीडी), कुणाल कन्नाके (वय २१, रा. भाडभिडी), रेखा चलाख (वय ५५, रा. जुनोना), अमर चलाख (वय ५७, रा. जुनोना), देवाजी गव्हारे (वय ५५, रा. कुनघाडा), गुरूदास वासेकर (वय ६०, रा. भिवापूर) अशी जखमींची नावे आहेत.
स्कार्पिओ क्रंमाक (एमएच ४६-पी ५३९२) ही १६ वऱ्हाडी घेऊन रामपूर येथून दुपारी ३ च्या सुमारास लग्न सोहळा आटोपून भाडभिडी (मोकासा) येथे जात होती. दरम्यान, गडचिरोलीकडून चामोर्शीकडे जाणाऱ्या (एमएच १५ सीके ५००५) या ट्रॅव्हल्सची स्कार्पिओला जोरदार धडक बसली. या ट्रॅव्हल्सवर त्रिवेणी अर्थमूव्हर्स असे लिहिले होते. या अपघातात स्कार्पिओचे प्रचंड नुकसान झाले. अपघातानंतर जखमींना चामोर्शी येथील उपजिल्हा रुग्णालयात प्रथमोपचार केल्यानंतर गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. उपचारासाठी नेताना वाटेत दोघांचा मृतयू झाला. उर्वरित जखमींवर उपचार सुरु असून, काही जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. अपघात एवढा भीषण होता की,स्कार्पिओच्या पुढच्या भागाचा चक्काचूर झाला होता.काही प्रवासी वाहनातच अडकून पडले होते. आवाज ऐकून परिसरातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेऊन मदत कार्य सुरु केले.
त्रिवेणी अर्थमूव्हर्सचा संबंध नाही
दरम्यान, या भीषण अपघाताशी लॉयड्स मेटल्स किंवा त्रिवेणी अर्थमूव्हर्स कंपनीशी कोणताही संबंध नसल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. ही बस त्रिेवेणी अर्थमूव्हर्स कंपनीसाठी २०२६ पूर्वी चालवली जात होती. मात्र, त्यानंतर ती एका खासगी ऑपरेटरकडून चालवली जात होती. त्याच्याकडून कंपनीच्या बॅनरचा बेकायदेशीरपणे वापर केला जात होता. या दुर्देर्वी घटनेबाबत कंपनी शोकमग्न असल्याचे त्रिवेणी अर्थमूव्हर्स कंपनीने म्हटले आहे.