गडचिरोली : भारताला २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनविण्याच्या उद्देशाने ‘विकसित भारत युवा नेतृत्व संवाद-२०२७’ या राष्ट्रीय उपक्रमाला ‘विकसित भारत क्विझ’च्या माध्यमातून सुरुवात झाली आहे. त्याअनुषंगाने गडचिरोली जिल्ह्यातील युवकांना नेतृत्वगुण, नवकल्पना आणि विकासाभिमुख संकल्पना पंतप्रधानांसमोर मांडण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
या उपक्रमातून विविध टप्प्यांमध्ये निवड झालेल्या युवा प्रतिनिधींना अंतिम राष्ट्रीय युवा नेतृत्व संवादात सहभागी होता येणार असून, नवी दिल्ली येथे १० ते १२ जानेवारी २०२७ दरम्यान होणाऱ्या अंतिम फेरीत पंतप्रधानांसमोर विकसित भारतासाठी आपल्या कल्पना मांडण्याची संधी मिळणार आहे.
‘विकसित भारत चॅलेंज’अंतर्गत भविष्यातील प्रशासन, हवामान सुरक्षा, लोकसंख्याशास्त्रीय लाभांश, शाश्वत औद्योगिकीकरण, कनेक्टिव्हिटी, उत्पादन क्षेत्र, आदिवासी नेतृत्व, नवकल्पना, फ्रंटियर टेक्नॉलॉजी आणि ब्लू इकॉनॉमी या दहा विषयांवर युवकांना आपल्या संकल्पना मांडता येणार आहेत.
या निवड प्रक्रियेत क्विझ, निबंध स्पर्धा, जिल्हास्तरीय चॅम्पियनशिप, राज्यस्तरीय युवा नेतृत्व संवाद आणि राष्ट्रीय युवा नेतृत्व संवाद, असे पाच टप्पे आहेत. ‘विकसित भारत क्विझ’मध्ये सहभागी होण्याची अंतिम मुदत ३० सप्टेंबर २०२६ आहे. गडचिरोली जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवकांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन युवा भारतचे सारंग मेश्राम यांनी केले आहे.