Agriculture Service Center Suspension
गडचिरोली : खताची अवैधरित्या साठेबाजी आणि जादा दराने खतविक्री करणाऱ्या १४ कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले आहे. २ केंद्रांना सक्त ताकीद देण्यात आली आहे. मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात खतविक्रीचा काळाबाजार सुरु आहे. काही कृषी सेवा केंद्रांचे संचालक अवैधरित्या खताची साठेबाजी करुन कृत्रिम टंचाई निर्माण करताना दिसत होते, तर काही जण जादा दराने विक्री करीत होते.
याबाबत तक्रारी प्राप्त झाल्यानंतर कृषी विभागाने १५ दिवसांत जिल्ह्यातील १३३ कृषी सेवा केंद्रांची तपासणी केली. त्यात गंभीर अनियमितता आढळल्याने ५२ कृषी सेवा केंद्रांना तातडीने खत विक्री बंद करण्याचे आदेश देण्यात आले. शिवाय देसाईगंज, आरमोरी, कुरखेडा, चामोर्शी, अहेरी व सिरोंचा या तालुक्यांतील १६ कृषी सेवा केंद्रांच्या संचालकांना जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रीती हिरळकर यांनी नोटीस बजावून बुधवारी (ता.१५) तातडीची सुनावणी घेतली.
संबंधितांकडील दस्तऐवजांची पडताळणी केल्यानंतर नियमांचे उल्लंघन झाल्याचे निष्पन्न होताच १४ कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले. तसेच २ केंद्रांना सक्त ताकीद देण्यात आली.
देसाईगंज तालुक्यातील नाकाडे कृषी केंद्र, कृषी विकास केंद्र, तसेच संजीवनी आणि किसान कृषी केंद्र, आरमोरी तालुक्यातील तावेडे कृषी केंद्र, कुरखेडा तालुक्यातील महाराष्ट्र कृषी केंद्र, चामोर्शी येथील सी.डी.गांधी फर्टिलायझर्स, अहेरी येथील प्रकाश कृषी केंद्र, सिरोंचा येथील मल्लिकार्जुन, अयप्पा, गजानन, शरदा, महालक्ष्मी कृषी केंद्र इत्यादी कृषी सेवा केंद्रावर कारवाई करण्यात आली आहे.