जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पाऊसामुळे गडचिरोली-आरमोरी, गडचिरोली-मूल, आलापल्ली-भामरागड, भामरागड-एटापल्ली, आलापल्ली-सिरोंचा या प्रमुख मार्गांसह ३१ मार्गांवरील वाहतूक ठप्प झाली आहे. यामुळे शेकडो गावांचा संपर्क तुटलेला आहे. जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या गडचिरोली शहरात 198 मिलिमीटर पाऊस पडल्याने शहरातील सखल भागात पाणी साचले आहे.
गडचिरोली तालुक्यातील कोटगल बॅरेजच्या कामावरील 70 कामगारांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे, तर भामरागड येथील २५ दुकानदारांचे स्थलांतर करण्यात आले आहे. तथापि, भामरागडनजीकच्या पर्लकोटा नदीचा पूर ओसरु लागला असून, गोसेखुर्द धरणातून होणारा पाण्याचा विसर्ग 2 लाख 14 हजार क्यूसेक्सवरुन कमी करुन तो 1 लाख 76 हजार क्यूसेक्स करण्यात आल्याने परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत आहे.
शनिवारी दुपारनंतर देसाईगंज तालुक्यातील कोंढाळा येथील वंश भुते (वय.8) बालकाचा गावातील तलावात बुडून मृत्यू झाला. वंश हा आपल्या मित्रांसमवेत मासे पकडायला गेला होता. काही वेळाने गावकऱ्यांना त्याचा मृतदेह आढळून आला. मागील 72 तासांत अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम सुरु असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली. गडचिरोली तालुक्यात सर्वाधिक 171.3 मिलिमीटर पाऊस पडला. त्या खालोखाल भामरागड तालुक्यात 107.6 मिलिमीटर पावसाची नोंद झाली.