विदर्भ

वेदांतामधून फॉक्सकॉनने माघार घेतल्याने महाराष्ट्रासह देशाचे १० लाख कोटींचे नुकसान : अतुल लोंढे | Vedanta-Foxconn

backup backup

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : वेदांता-फॉक्सकॉन हा सेमीकंडक्टर प्रकल्प पुण्याजवळ प्रस्तावित होता. पण गुजरात विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय फायद्यासाठी तो गुजरातला पळवण्यात आला. आता फॉक्सकॉनने माघार घेतल्याने हा प्रकल्प बारगळला आहे. त्यामुळे महाराष्ट्राचे आणि पर्यायाने देशाचे १० लाख कोटींचे नुकसान झाले. मोदी हे देशासाठी तर फडणवीस हे राज्यासाठी हानीकारक आहेत, असा आरोप प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी आज पत्रपरिषदेत केला. एकंदरीत काल उद्धव ठाकरे यांनी तर आज काँग्रेसने उपमुख्यमंत्री फडणवीस यांना लक्ष्य केले आहे.

लोंढे पुढे म्हणाले, तब्बल १.५ लाख कोटी रुपये गुंतवणुक व १ लाख नोकऱ्या निर्माण करणारा हा प्रकल्प होता. वेदांता फॉक्सकॉन प्रकल्पासाठी पुणे परिसरातील वातावरण अत्यंत अनुकुल आहे. या प्रकल्पासाठी आवश्यक असणारे कुशल मनुष्यबळ, आवश्यक सोयी सुविधा या परिसरात उपलब्ध आहेत. मविआ सरकारचे काळात मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली बैठकही झाली पण हा प्रकल्प गुजरातमध्ये नेण्यात आला. गुजरातमध्ये ज्या भागात य प्रकल्पाला जागा देण्यात आली त्या ठिकाणी हा प्रकल्प उभा राहणे अशक्यच होते, शेवटी तेच झाले. हा प्रकल्प गेल्यामुळे देशाचे तब्बल १० लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. महाराष्ट्रातून हा प्रकल्प देवेंद्र फडणवीसांच्या हाताखालून गेला. राज्यातील लाखो तरुणांचे रोजगारही गेले.

फॉक्सकॉनने वेदांताबरोबरचा करार मोडीत काढल्याने आता मायक्रॉन सेमीकंडक्टर प्रकल्पाच्या भवितव्यावरही संशयाचे ढग जमा झालेत. वायब्रंट गुजरात व मेक इन इंडियाच्या नावाने मोठ्य-मोठ्या घोषणा केल्या गेल्या पण प्रत्यक्षात त्यातील किती प्रकल्प आले यावर श्वेतपत्रिका काढण्याची गरज आहे. फॉक्सकॉनने माघार घेतल्याने इतर कंपन्यांच्या परदेशी गुंतवणुकीवरही याचा परिणाम होऊन भारताचे नुकसानच होणार आहे यावर लोंढे यांनी भर दिला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT