भंडारा; पुढारी वृत्तसेवा : उन्हाळी धान पिकासाठी रोवणीपूर्व चिखलासाठी पाणी देण्यासाठी गेलेल्या एका शेतकऱ्यावर वीज कोसळल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. रविवारी (दि.१९) लाखांदूर तालुक्यातील खैरना शेतशिवरात सायंकाळी ६ च्या सुमारास ही घटना घडली. बाबुराव रामचंद्र मेश्राम (वय,४५ रा. दोनाड) असे या शेतकऱ्याचे नाव आहे.
मागील दोन दिवसांपासून विविध भागात ढगाळ वातावरण आहे. घटनेच्या दिवशी सायंकाळच्या सुमारास अचानक मेघगर्जनेसह विजा चमकू लागल्या. अशातच बाबुराव शेतावर पाणी देण्यासाठी गेले असताना वीज कोसळून त्यांचा मृत्यू जागीच झाला. उशिरापर्यंत बाबुराव घरी न परतल्याने कुंटूंबातील व्यक्तींनी त्यांचा शोध सुरू ठेवला. रात्री नऊच्या सुमारास शेत शिवार गाठले असता शेतात बाबुराव मृतावस्थेत दिसून आले.