चंद्रपूर : वर्धा नदीवरील बेलोरा पुलावरून एका ३५ वर्षीय युवकाने नदीत उडी घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना बुधवारी (दि.९) सकाळी साडेआकराच्या सुमारास घडली. प्रफुल्ल अशोक रसाड (वय ३५) असे तरूणाचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, घुग्घुस येथील रहिवासी प्रफुल्ल रसाड हा तरूण बुधवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास बेलोरो येथील वर्धा नदीच्या पुलावर आला. त्याने तिथे आपली मोटरसायकल उभी केली. त्यानंतर त्याने पुलावरून नदीत उडी मारल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेची माहिती प्रत्यक्षदर्शींनी तत्काळ घुग्घुस पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून नदीपात्रात युवकाचा शोध घेण्याचे काम सुरू करण्यात आले. दरम्यान, घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी पुलावर मोठी गर्दी केली होती. प्रफुल्लने नेमक्या कोणत्या कारणातून हे टोकाचे पाऊल उचलले, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. पोलिसांकडून या घटनेचा तपास सुरू आहे.
प्रफुल्लचे वडील अशोक रसाड हे घुग्घुस नगरपालिकेत कर्मचारी म्हणून कार्यरत होते. ते सध्या सेवानिवृत्त आहेत. दोन मुलांपैकी प्रफुल हे धाकटे असल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेने रसाड कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्याचा पोलिसांकडून शोध सुरू असून, पुढील तपासानंतर घटनेचे नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे.