Akapur village tiger
चंद्रपूर : नागभिड तालुक्यातील आकापुर शेतशिवारात वाघाच्या हल्ल्यात झालेला शेतकऱ्याचा मृत्यू विसरायच्या आतच, आज गुरूवारी (30 ऑक्टोबर) ला सायंकाळी चारच्या सुमारास ताजे मोठे आणि लहान पगमार्क आढळून आले आहे. त्यामुळे या शेतशिवारात वाघीण आणि तिच्या बछड्यांचा वावर असल्याचा संशय नागरिकांनी व्यक्त केला आहे. काल रात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे शेतशिवारत ओला चिंब झाल्याचे चिखलात पगमार्क आढळून आले. शेतकऱ्यांमध्ये भीतीचे सावट कायम आहे.
नागभिड तालुक्यातील काल रात्रीपासून जोरदार पाऊस आज गुरूवारी सकाळपर्यंत पडला. त्यामुळे शेतशिवार ओला चिंब झाला. शिवारात चिखलात ये जा करताना पाऊल् खुना स्पष्टपणे दिसून येत आहेत. शेतशिवारात आज (गुरुवार) दुपारच्या सुमारास ईश्वर सहारे याचे शेतामध्ये चार वाजताचे सुमारास काही शेतकऱ्यांना चिखलात वाघिणीचे आणि दोन लहान बछड्यांचे ताजे पगमार्क दिसून आले. या परिसरात पावसामुळे जमिनीत चिखल झाल्याने पगमार्क स्पष्टपणे उमटले होते. गावापासून पाऊण किमी अंतरावरील मोठ देव मंदिराजवळील शेतशिवारात हे पगमार्क आढळताच ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
मागील शुक्रवारी सायंकाळी आकापूर येथील शेतकरी वासुदेव सितकुरा वेठेहा शेतावर गेला असता त्याचेवर वाघाने हल्ला करून ठार केले होते. ते स्वतःच्या शेतात गेले असताना ही दुर्दैवी घटना घडली होती. त्यानंतर वनविभागाने गस्त वाढवली असली तरी अजूनही वाघाचा बंदोबस्त झालेला नाही. त्यामुळे या भागातील शेतकरी सातत्याने धास्तावलेले आहेत. काल बुधवार रात्रीपासून अवकाळी पावसाचे आगमन झालेअ आहे. आज सकाळपर्यंत पाऊस सुरू होता. पावसामुळे शेतशिवार चिखलमय झाले आहे. तरीदेखील काही शेतकरी, वनविभागाच्या मदतीने, गटाने जाऊन आपली शेतीकामे करत आहेत. मात्र, आज पुन्हा एकदा ताजे पगमार्क आढळून आल्याने नागरिकांना धडकी भरली आहे. याचे कारण म्हणजे दोन प्रकारचे पगमार्क आढहून आले. त्यामध्ये मोठे आणि लहान पगमार्क आहेत. या पगमार्क वरून वाघिण व तिच्या बच्छड्यांचे ते पगमार्क असावेत असा अंदाज नागरिकांनी वर्तविला आहे.
स्थानिक ग्रामस्थांच्या मते आकापूर शेतशिवारात वाघिणीचा बछड्यांसह वावर असल्याचा सांगत आहेत. त्यामुळे ती आक्रमक होण्याची शक्यता अधिक आहे. अशा वेळी कोणताही अपघात घडू नये म्हणून वनविभागाने तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी पुन्हा केली जात आहे. काही दिवसांपासून आकापुर व लगतच्या शिवारात वाघाच्या हालचाली सतत दिसून येत आहेत. वनविभागाने या परिसरात कॅमेरे लावून त्यावर निगराणी सुरू केली आहे, आठवडाभराचा कालावधी होऊनही वाघ किंचा वाघिण व बच्छड्यांचा बंदोबस्त वनविभाग करू शकला नाही, त्यामुळे नागरिकांमध्ये वनविभागाबद्द रोष वाढत आहे. दरम्यान, रात्रीच्या वेळी गावातून बाहेर जाण्यावर नागरिकांनी मर्यादा घातल्या आहेत. गावातील लोकांनी लहान मुलांना घराबाहेर जाऊ न देण्याचे आवाहन केले आहे. धान कापणी पूर्णपणे ठप्प झाली असून शेतातील कामे थांबली आहेत.
आठवडाभरापासून चालू असलेल्या या परिस्थितीमुळे शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. रात्री गावात शांतता असून लोकांना घराबाहेर पडणेही कठीण झाले आहे. वाघिणीच्या हालचाली शेतशिवारातील मंदिर परिसरापर्यंत आल्याने गावाकडे तिचा वावर वाढल्याची भीती व्यक्त केली जात आहे. वनविभागाकडून या भागात गस्त वाढवून, कॅमेरे बसवून आणि पगमार्कचा मागोवा घेऊन वाघिणीच्या हालचालींवर लक्ष केंद्रीत करून बंदोबस्त करावा अशी जोरदार मागणी नागरिकांनी केली आहे.