चंद्रपूर: महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियान, जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष, जिल्हा परिषद चंद्रपूर व राणी हिराई उमेद मार्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंबा महोत्सवाचे उद्घाटन जिल्हाधिकारी वसुमना पंत तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह यांचे हस्ते करण्यात आले.
15 ते 17 मे 2026 या कालावधीमध्ये खास चंद्रपूरकरांसाठी सेंद्रिय पद्धतीने पिकवलेला अस्सल आणि रसाळ कोकणचा राजा, हापूस आंबा थेट कोकणातील बागातून चंद्रपूर मध्ये उपलब्ध असणार आहे. या आंबा महोत्सवामध्ये अस्सल देवगड आणि रत्नागिरी हापूस आंबा थेट शेतकऱ्यांच्या भागातून नैसर्गिक पद्धतीने पिकविलेले विशेष म्हणजो घातक रसायने किंवा कार्बाईड विरहित आंबे, रत्नागिरी येथील प्रसिद्ध काजू उपलब्ध असणार आहे.
या संधीचा लाभ घेण्याकरिता 15 ते दिनांक 17 मे 2026 या कालावधीमध्ये सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत राणी हिराई उमेद मार्ट, जुबली हायस्कूल, हॉस्पिटल वॉर्ड, चंद्रपूर येथे उपलब्ध असणार आहे. नागरिकांनी आंबा महोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह यांनी केले.