चंद्रपूर, पुढारी वृत्तसेवा : भंडाऱ्यातील गोसेखुर्द आणि अन्य धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग वैनगंगेमध्ये होत आहे. रविवारी (दि.22) रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे ब्रह्मपुरीमध्ये वैनगंगेने धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नदी नाल्यांना पूर आला आहे. याच पुरामुळे ब्रह्मपुरी तालुक्यातील तेरा गावांचा संपर्क तुटला आहे.
संततदार पावसामुळे भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द प्रकल्प आणि अन्य धरणातून याच वैनगंगेमध्ये पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग होत आहे त्यामुळे वैनगंगा दुथडी वाहत आहे. वैनगंगा नदीच्या काठावरीलअरेर नवरगाव, नवरगावं, पिंपळगावं (भो), बेटाला, पारडगावं, मांगली,भालेश्वर,नांदगाव, तोरगाव, नान्होरी,कन्हाळगाव,बोरगाव,झिलबोडी आदी गावांचा ब्रह्मपुरी तालुक्यासोबत संपर्क तुटलेला आहे. अरेर नवरगाव आणि पिंपळगाव भोसले येथे पुराचे पाणी शिरलेले आहे.
ब्रम्हपुरी तालुक्यात सद्या चौगान गांगलवाडीजवळ पूर आल्याने ब्रम्हपुरी गांगलवाडी आवळगाव मार्ग बंद आहे. जुगनाळा जवळ पूर असल्याने मालडोगरी ते गांगलवाडी मार्ग बंद आहे. ब्रम्हपुरी जवळील भूती नाला फुटल्याने ब्रम्हपुरी ते वडसा हा मार्ग 15 दिवसापासून बंद आहे. या ठिकाणावरून बाजूने तात्पुरता मार्ग काढला होता, परंतु पुपुरामुळे तोही रस्ता वाहून गेल्यामुळे हा मार्ग बंद आहे. वडसा जायचे असेल तर अन्य खेडे गावातून अंतर कापून जावे लागते.