Nagbhid Tekari Tiger Attack Farmer killed
चंद्रपूर : नागभीड तालुक्यातील टेकरी येथे मंगळवारी (दि.१३) सायंकाळी वाघाच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. अगदी गावालगत आणि रस्त्याच्या कडेला ही घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
नागभीड तालुक्यातील वनपरीक्षेत्र नागभीड अंतर्गत येणाऱ्या टेकरी गावात आज सायंकाळी सुमारे ६ वाजताच्या सुमारास वाघाच्या हल्ल्यात शेतकरी भाऊराव विठोबा राऊत (वय ६०,) रा. तोरगाव यांचा मृत्यू झाला. ही घटना अगदी गावालगत असलेल्या आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतात घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
भाऊराव राऊत यांचे शेत टेकरी गावालगत असून, ते सायंकाळच्या वेळी आपल्या शेतात तुरीच्या पिकाची पाहणी करण्यासाठी आले होते. शेतातील काम आटोपून ते घरी जाण्याच्या तयारीत असतानाच दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक त्यांच्यावर झडप घातली. या हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.
शेत हे गावालगत व रस्त्याच्या कडेला असल्याने ये-जा करणाऱ्या नागरिकांच्या ही घटना लक्षात आली. घटनेची माहिती तात्काळ वनविभागाला देण्यात आली. माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी तसेच नागभीड पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून पुढील तपासाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
या घटनेनंतर टेकरी व परिसरातील गावांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वाघाने अगदी मानवी वस्तीच्या जवळ हल्ला केल्यामुळे शेतकरी वर्गात प्रचंड दहशत पसरली आहे. “आता शेतातील पिके कापायची कशी? माल घरी आणायचा तरी कसा?” असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे.
दरम्यान, परिसरात वाघाचा वावर वाढल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येत असून, वनविभागाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.