Korpana farmer burns soybean crop
चंद्रपूर: कोरपना तालुक्यातील बोरी नवेगाव येथे धक्कादायक घटना घडली आहे. वहिवाटीचा रस्ता अडवल्याने शेतात जाणे अशक्य झाल्यानंतर एका शेतकऱ्याने मानसिक त्रासाला कंटाळून हतबल स्थितीत स्वतःच्या 10 एकरातील सोयाबीन पेटवून दिला.
कोरपना तालुक्यातील बोरी नवेगाव येथे प्रशासनाच्या निष्क्रियतेची महाग किंमत एका शेतकऱ्याला आपल्या पिकाने मोजावी लागली. कोंडू आत्राम या शेतकऱ्याचा शेताकडे जाणारा पारंपरिक रस्ता समोरच्या शेतकऱ्यांनी गेल्या हंगामापासून मुद्दाम अडवून ठेवला होता. परिणामी, त्यांच्या शेतात काढणी आणि मळणीसाठी जाणे अशक्य बनले होते. त्यामुळे शेतात काढलेले सोयाबीन पीक त्याने टोकाचे पाऊल उचलले.
आत्राम यांनी अनेक वेळा ग्रामपंचायत, महसूल विभाग आणि स्थानिक प्रशासनाकडे तक्रारी करून रस्ता मोकळा करून देण्याची मागणी केली. मात्र, दोन महिन्यांपासून कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने, सोयाबीन शेतातच कुजण्याची वेळ आली. या दरम्यान पिके शेतात पडून राहिली, हवामान बदलत गेले आणि पीक वाया जात असल्याचे पाहून आत्राम यांची आर्थिक व मानसिक स्थिती अधिक बिकट झाली.
शेवटी, हताश आणि त्रस्त झालेल्या कोंडू आत्राम यांनी टोकाचे पाऊल उचलत स्वतःच्या 10 एकरातील सोयाबीन पिकाला पेटवून दिले. या घटनेत त्यांना लाखोंचे आर्थिक नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. याची व्हिडीओ-फोटोद्वारे नोंदही झाली असून ते सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
या प्रकारामुळे प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पारंपरिक रस्ता अडवण्याचा प्रकार कायद्याने चुकीचा असूनही कारवाई होत नसल्याने दोषींना पाठीशी घालण्याचा आरोप होत आहे. या प्रकरणी महसूल विभागाकडून जळालेल्या सोयाबीन पिकाचा पंचनामा केला जाईल का? खरंच शेतकऱ्यांना न्याय मिळवून मिळेल का असे प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाले आहेत.
मी कुणाकडे न्याय मागायचा? रस्ता अडला म्हणून पीक वाचवू शकलो नाही. प्रशासनाकडे गेलो, पण कुणालाच काही पडले नव्हते,- कोंडू आत्राम, शेतकरी