चंद्रपूर : वन सर्वेक्षण विभागाने २०२३ ची भारतातील वनांचे प्रमाण आणि स्थिती दर्शविणारी आकडेवारी नुकतीच जाहीर केली आहे. त्यात देशात २५.१७ % जंगल क्षेत्र, महाराष्ट्रात १६.९४ % आणि चंद्रपूर जिल्ह्यात ३५.२१ % वन क्षेत्र असल्याचे म्हटले आहे. २०२१ मध्ये चंद्रपूर जिल्ह्यात ३५.४०% जंगल होते तर २०२३ च्या आकडेवारी नुसार चंद्रपूर जिल्ह्यातील वनाचे प्रमाण ३५.२१ % आहे. २०२१ च्या तुलनेत जंगल कमी झाले असल्याची धक्कादायक माहिती आली आहे.
२०२१ मध्ये घनदाट जंगल १३२०.८९ वर्ग किमी होते. ते २०२३ मध्ये कमी होऊन १३१८.८७ वर्ग किमी झाले. २०२१ मध्ये मध्यम घनदाट जंगल १५५५.३९ वर्ग किमी होते, ते घटून २०२३ मध्ये १५२१.६० वर्ग किमी झाले. २०२१ मध्ये उघडे वन ११७३.९९ वर्ग किमी होते ते वाढून २०२३ मध्ये ११८९.१८ वर्ग किमी झाले. झुडपी जंगलात मात्र अल्पशी वाढ झाली, २०२१ मध्ये हे प्रमाण ४४.०६ होते ते वाढून २०२३ मध्ये ४३ ६७ झाले. २०२१ मध्ये एकूण जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्रफळ ११४४३.०० वर्ग किमी होते, त्या वेळी वनक्षेत्र ४०५०.२७ वर्ग किमी होते मात्र २०२३ मध्ये ते घटून ४०२९.६५ झाले.
देशात वन क्षेत्र वाढले असताना आणि चंद्रपूर वनांचा आणि वन मंत्र्यांचा जिल्हा असताना तसेच इथे मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण झाले असताना चंद्रपुर चे वन क्षेत्र कसे कमी झाले? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. आधीच चंद्रपूर जिल्ह्यात वाघ मानव संघर्ष वाढलेला आहे. भ्रमण मार्ग तुटले असताना वन क्षेत्र कमी होणे ही चिंतेची बाब असल्याची प्रतिक्रिया प्रा. सुरेश चोपणे यांनी दिली आहे.