चंद्रपुरातील गंगापूरामध्ये दुषित पाण्यामुळे अतिसार व पोटदुखीच्या आजाराची साथ पसरलेली आहे. हे सर्व आजार गावामध्ये दुषित पाणीपुरवठा झाल्यामुळे झाला आहे. या साथीच्या रोगामुळे ग्रस्त असलेल्या 21 वर्षीय तरुणाचा शनिवारी (दि.17) मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर पोंभूर्णा तालुक्यातील गंगापूर गावात तातडीने शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी आरओची व्यवस्था करा असे निर्देश पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हा यंत्रणेला दिले आहेत. दूषित पाण्यामुळे होणाऱ्या आजारापासून नागरीकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आरोग्य विभाग सक्रिय असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली.
गंगापूरमध्ये अतिसारामुळे दोघांनी जीव गमावल्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीची संपूर्ण माहिती घेत नागरिकांना तात्काळ मदत कार्य करण्याचे निर्देश पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले शासकीय यंत्रणेला दिले. 231 लोकसंख्या असलेल्या या गावात आतापर्यंत 16 रुग्णांना उपचारासाठी भरती करण्यात आले. सद्या 3 रुग्ण उपचार घेत आहेत. पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी मदतकार्यासाठी प्रशासनाला आणि आरोग्य यंत्रणेला तत्पर राहण्याचे आदेश दिले असून पिण्याच्या शुद्ध पाण्यासाठी तातडीने आरओची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या आहेत.
गंगापूर येथील नागरिकांना वैनगंगेचे पाण्यावाचून पर्याय नाही. पूर ओसरला असला तरी पाणी गढूळ आहे. त्या पाण्यामुळेच हगवण उलटी पोटदुखण्याच्या तक्रारीत वाढ झाली आहे. आरोग्य विभागाने प्रत्येक घरी जीवन ड्रॉप दिला आहे. सर्व शेतकरी असल्याने शेतातही ते गढूळ पाणी पीत आहेत.सूरज मंढरेला त्रास झाला तेव्हा तो शेतातून फवारणी करून आला होता.त्याची प्रकृती सुधारली पण होती.पण पोटदुखीमुळे त्याला चंद्रपूरला हलविण्यात आले,तेथे त्याचा मृत्यू झाला.आरोग्य विभाग योग्य ती काळजी घेत आहे,पण गंगापूरवासीयांना शुध्द पाणी पुरवठा करण्याची तातडीने गरज आहे. सूरजचा मृत्यू दूषित पाण्यामुळे कि फवारणी करतेवेळी विषबाधामुळे झाला याचे कारण शवविच्छेदन अहवाल आल्यावर कळणार आहे, अशी माहिती पोंभूर्ण्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ संदेश मामीडवार यांनी दिली आहे.