चंद्रपूर : पुढारी वृत्तसेवा
चंद्रपुरात (सोमवार) पार पडलेल्या काँग्रेसच्या आढावा बैठकीमध्ये पूर्व विदर्भातील सर्व जागा या काँग्रेसलाच मिळाव्यात ही काँग्रेस कार्यकत्यांची जनभावना महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये मांडू असे मत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केले. ते चंद्रपुरात आढावा बैठकीनंतर पत्रकारांच्या प्रश्नाना उत्तर देताना बोलत होते.
विदर्भाची विधानसभेची रणनीती ठरविण्याच्या अनुषंगाने, (सोमवार) चंद्रपुरात राज्यातील काँग्रेसच्या नेत्यांची महत्वाची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी चैनीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरात, खासदार प्रतिभा धानोरकर, आमदार सुभाष धोटे व काँगेसचे अनेक नेते उपस्थित होते.
आढावा बैठक पार पडल्यानंतर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. यावेळी आढावा बैठकीमध्ये पूर्व विदर्भातील सर्व सोळाही जागा या काँग्रेलसला मिळाव्यात अशा भावना काँग्रेस कार्यकर्त्यांनी मांडल्या. यावर बोलताना पटोले म्हणाले, पूर्व विदर्भ तर काँग्रेसचा गड राहिला आहे. त्यामुळे काँग्रेसला पूर्व विदर्भातील खास करून चारही जिल्ह्यातील सर्व जागा मिळणे या कार्यकर्त्यांच्या भावना समोर आल्या आहेत.
कार्यकर्ते आणि जनभावनांचा आदर राखत महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये त्या भावना मांडू. मित्र पक्षांना समजावून सांगू की, राज्यातील महाभ्रष्टाचारी शिवद्रोही सरकार पाडायचे असेल तर पूर्व विदर्भात काँग्रेसला प्राधान्य दिले पाहिजे. जो सर्वे आला आहे. त्या सर्वेच्या आधारे तोच निर्णय व्हावा हीच अपेक्षा आहे. आजच्या बैठकीमध्ये राज्यातील काँग्रेसच्या नेत्यांची उपस्थिती होती. सर्व नेते एकत्र आल्याने काँग्रेसची शक्ती वाढेल असा आशावादाही पटोले यांनी व्यक्त केला.