Water Hole Sitting Method
चंद्रपूर : उन्हाळ्याच्या कडक तापमानात जंगलातील प्रत्येक जीव पाण्याच्या शोधात पाणवठ्यांकडे वळतो. याच नैसर्गिक सवयीचा उपयोग करून वनविभाग दरवर्षी बुद्ध पौर्णिमेच्या चांदण्यांनी उजळलेल्या रात्री “पाणवठा आधारित प्राणी गणना” म्हणजेच वॉटर होल सिटिंग ही पारंपरिक पण परिणामकारक पद्धत राबवतो. आधुनिक तंत्रज्ञानाची साथ मिळूनही १९८० च्या दशकापासून सुरू असलेली ही पद्धत आजही तितकीच विश्वासार्ह मानली जाते. राज्यातील सहाही व्याघ्र प्रकल्पात उद्या शुक्रवारी 1 मे ला निसर्गानुभवातून वन्यप्राणी गणना पार पडत आहे.
भारतामध्ये प्राणी गणनेची ही परंपरा कर्नाटकमधील नागरहोळे आणि बांदीपूर अभयारण्यात सुरू झाली. मैसूरच्या महाराजांनी आणि नंतर ब्रिटिश अधिकाऱ्यांनी या पद्धतीला आकार दिला. त्या काळात वैज्ञानिक साधनांची कमतरता असल्याने पूर्ण चंद्रप्रकाशात प्राणी सहज दिसतात या तत्त्वावर ही पद्धत विकसित झाली.
नंतर ही पद्धत देशभरातील विविध अभयारण्यांत आणि व्याघ्र प्रकल्पांत राबवली जाऊ लागली. महाराष्ट्रात ताडोबा-अंधारीसह अनेक प्रकल्पांमध्ये १९८० पासून ही गणना नियमितपणे केली जाते.
महाराष्ट्रात सध्या सहा प्रमुख व्याघ्र प्रकल्प कार्यरत आहेत. त्यामध्ये मेळघाट व्याघ्र प्रकल्प, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प,सह्याद्री व्याघ्र प्रकल्प, नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प, बोर व्याघ्र प्रकल्प आणि पेंच व्याघ्र प्रकल्प
या सर्व प्रकल्पांमध्ये उद्या शुक्रवारी 1 मे ला निसर्गानुभवातून वन्यप्राणी गणना बुद्ध पौर्णिमेच्या रात्री निसर्गानुभवातून पाणवठा गणना मोठ्या प्रमाणावर पार पडणार आहे.
ही पद्धत पूर्णतः निरीक्षणावर आधारित आहे. वन कर्मचारी, पर्यटक, स्वयंसेवक आणि अधिकारी पाणवठ्यांच्या आसपास ठराविक ठिकाणी बसून संपूर्ण रात्री प्राण्यांची नोंद करतात. पाण्यासाठी येणाऱ्या प्राण्यांची संख्या, प्रजाती, वेळ आणि वर्तन यांची अचूक माहिती नोंदवली जाते. ही प्रक्रिया साधी वाटली तरी त्यामागे मोठे नियोजन आणि शिस्त आवश्यक असते.
1. उन्हाळ्यात पाण्याची कमतरता – सर्व प्राणी पाणवठ्यांवर येतात, त्यामुळे निरीक्षण सोपे होते.
2. पूर्ण चंद्रप्रकाशाचा फायदा – बुद्ध पौर्णिमेच्या उजेडात रात्रीही स्पष्ट दृश्य मिळते.
3. सर्व प्रजातींची माहिती – वाघ, बिबट्या, अस्वल, हरणे, रानडुक्कर, लांडगे यांचा डेटा मिळतो.
4. वन्यजीव व्यवस्थापनास मदत – घनता, हालचाल आणि पर्यावरणीय साखळी समजते.
5. जनसहभाग वाढतो – स्वयंसेवक आणि निसर्गप्रेमींचा सहभाग वाढतो.
पूर्वी ही प्रक्रिया पूर्णतः मानवी निरीक्षणावर आधारित होती. आता मात्र GPS, GIS, कॅमेरा ट्रॅप, डिजिटल नोंदी यांचा वापर वाढला आहे. तरीही प्रत्यक्ष निरीक्षणावर आधारित ही पद्धत वनविभागासाठी आजही अत्यंत महत्त्वाची आहे.
पाणवठा गणनेतून मिळालेल्या माहितीनुसार वनविभाग अनेक महत्त्वाच्या उपाययोजना जसे पाणवठ्यांची वाढ आणि सुधारणा, ज्या भागात पाण्याची कमतरता आहे तिथे नवीन पाणवठे तयार केले जातात. सौर पंप आणि विहिरींचा वापर केला जातो. सुरक्षा आणि गस्त वाढवणे,
संवेदनशील भागात पेट्रोलिंग वाढवून शिकारी रोखण्यावर भर दिला जातो. मानव-वन्यजीव संघर्ष टाळणे, गावांमध्ये अलर्ट सिस्टम, कुंपण आणि जनजागृती कार्यक्रम राबवले जातात. जंगल व्यवस्थापनाचे नियोजन,कोअर आणि बफर झोनचे पुनर्नियोजन, वनस्पती व्यवस्थापन यावर काम केले जाते. पर्यटन नियंत्रण, प्राण्यांना त्रास होऊ नये म्हणून काही क्षेत्रे तात्पुरती बंद ठेवली जातात.
दरवर्षी बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने रात्री “निसर्ग अनुभव कार्यक्रम”ही आयोजित केला जातो. यात वनाधिकारी, कर्मचारी आणि निसर्गप्रेमी सहभागी होऊन जंगलातील जीवन जवळून अनुभवतात. ब्रिटिश काळात सुरू झालेली ही पद्धत आज अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या युगातही टिकून आहे. कारण तिची साधी रचना, प्रत्यक्ष निरीक्षणाची अचूकता आणि व्यवस्थापनासाठी उपयुक्तता अजूनही अबाधित आहे. जंगलाच्या शांत रात्रीत पाणवठ्याजवळ बसून केलेली ही गणना केवळ आकडेवारी नसून, ती निसर्गाशी जोडणारा आणि संवर्धनाची जाणीव करून देणारा एक महत्त्वाचा क्षण आहे.