वाघाच्या शोधार्थ गस्त घालताना वनविभागाचे पथक  Pudhari Photo
चंद्रपूर

Chandrapur Tiger Attack|नरभक्षक वाघाच्या शोधासाठी वनविभागाचा ‘ॲक्शन मोड’ : दुसऱ्या रात्रीही घटनास्थळी वाघाचे आगमन

आकापूर शेत शिवारात लावले कॅमेरे, 10 कर्मचारी तैनात : शेतकऱ्यांच्या संरक्षणासाठी वनविभागाचा पहारा

पुढारी वृत्तसेवा

चंद्रपूर : नागभीड तालुक्यातील आकापूर येथील शेत शिवारात शुक्रवारी सायंकाळी  शेतात गेलेल्या 55 वर्षीय शेतकरी वासूदेव लक्ष्मण वेटे यांचा दबा धरून बसलेल्या वाघाने  हल्ला करून जीव घेतला. यानंतर रात्रीपासून  वाघाचा बंदोबस्त करण्याकरता वन विभागाने पावले उचलले आहेत. घटनास्थळ व परिसरामध्ये सात ट्रॅप व एक लाईव्ह कॅमेरे लावून वाघाच्या हालचालीवर निगराणी ठेवली जात आहे. तसेच दहा कर्मचाऱ्यां चमूने गस्त सुरू केली आहे.

विशेष म्हणजे दुसऱ्या रात्री त्याच घटनास्थळी वाघाच्या आगमन झाले आहे. सर्व परिसरात वाघाचे भ्रमंती दिसून येत असल्याने वनविभागाने आकापूर परिसरातील शेतकऱ्यांना सुरक्षा करता जम्मू तैनात केलेली आहे. पहिल्या दिवशी अनेक शेतकऱ्यांनी शेतावर जाणे टाळले परंतु अत्यावश्यक असलेल्या काही शेतकऱ्यांना घेऊन वनविभागाची चमू शेतावर गेली आणि त्यांना सुरक्षा प्रदान केली. शुक्रवारी सायंकाळी वासूदेव लक्ष्मण वेठे या शेतकऱ्याचा वाघाच्या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.

विशेष म्हणजे सदर वाघाबाबत आठ दिवसांपूर्वीच तळोधी वनपरिक्षेत्र कार्यालयाला गावकऱ्यांनी माहिती देण्यात आली होती. परंतु ठोस उपाययोजना न झाल्याने संतप्त नागरिकांनी व कुटुंबीयांनी वाघाचा तात्काळ बंदोबस्त, कुटुंबाला आर्थिक मदत, व भविष्यातील सुरक्षेची मागणी करीत मृतदेह उचलण्यास नकार दिला होता. परिस्थिती ताणली असतानाच तळोधी (बाळापूर) वनपरिक्षेत्र अधिकारी शहा मॅडम यांनी, तातडीने घटनास्थळी  नागरिकांशी संवाद साधला. दोन-तीन तासानंतर त्यावर लेखी हमीपत्र देऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यानंतर मृतदेह ताब्यात घेऊन अंत्यसंस्कार पार पडले.

शेतकऱ्यांचा सूचना करताना वनविभागाचे कर्मचारी

वनविभागाचा ‘ॲक्शन मोड’

घटनेनंतर वनविभाग तात्काळ वाघाच्या हालचाली टिपण्यासाठी कामाला लागला आहे. वनपरिक्षेत्र कार्यालय तळोधी (बाळापूर) मार्फत आकापूर शेतशिवरात  वाघाच्या शोधासाठी सात ट्रॅप व एक लाईव्ह कॅमेरे बसविण्यात आले असून दहा  कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. हे कर्मचारी शेतशिवार आणि आजूबाजूच्या परिसरात दिवसरात्र गस्त घालत आहेत.

शनिवारच्या रात्री लावण्यात आलेल्या कॅमेऱ्यांमध्ये त्या ठिकाणी वाघ पुन्हा परत आल्याचे स्पष्ट झाले आहे. सदर शेतकऱ्याचा बळी घेणारा हाच वाघ आहे का, याची खात्री करण्यासाठी लाईव्ह कॅमेरा निरीक्षण आणि ट्रॅप तंत्रज्ञानाचा वापर सुरू आहे. आज (रविवार) रात्री देखील निगराणी सुरू ठेवून वाघाच्या हालचालींवर सतत लक्ष ठेवले जात आहे. वाघाला बेशुद्ध  करून पकडण्याची आणि सुरक्षितपणे बंदोबस्त करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

शेतकऱ्यांमध्ये दहशत – सुरक्षा उपाय वाढवले

सध्या धान कापणीचा हंगाम सुरू असून शेतकरी आणि मजूर वाघाच्या भीतीने शेतात जाण्यास घाबरत आहेत.  घटनेनंतर आकापूर परिसरातील भीती आणि अस्वस्थता अजूनही कायम आहे. त्यामुळे वनविभागाच्या तैनात चमूने अनेक शेतकऱ्यांना संरक्षण देत शेतात नेण्याची जबाबदारी घेतली आहे.

हंगामामध्ये काम करणाऱ्या शेतकरी शेतमजरांच्या सुरक्षिततेची खात्री वनविभागाकडून  केली जात आहे. याशिवाय परिसरातील रस्त्यांच्या कडेला वाढलेला कचरा साफ केला जाणार आहे. तसेच झुडपी झाडे कापण्याचे काम सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, जेणेकरून वन्य प्राण्यांना  लपण्यासाठी जागा मिळणार नाही.

वाघाच्या हालचालींवर सतत लक्ष

वनविभागाने आकापूर आणि शेजारील परिसरात ट्रॅप आणि लाईव्ह कॅमेरे बसवून सतत निरीक्षण सुरू केले आहे. कॅमेऱ्यांमधील हालचालींचा अभ्यास करून वाघाचा मागोवा घेण्यात येत आहे. पहिल्या दिवशीच्या रात्री वाघानचे पुन्हा घटनास्थळी आगमन झाले. पुन्हा आजही त्याच घटनास्थळी वाघ येतो की काय याबाबत निगराणी ठेवण्यात आली आहे. त्यानंतर त्याला बेशुद्ध करून जेरबंद करण्याची प्रक्रिया केली जाणार आहे. शिवाय या परिसरात लावण्यात आलेल्या ट्रॅप कॅमेऱ्याद्वारे त्याचे कोणकोणत्या परिसरामध्ये हालचाली आहेत तेही बघितल्या जात आहेत. या संपूर्ण घटनेची माहिती वरिष्ठ स्तरावर पोहोचवून आवश्यक पथके तयार ठेवली आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT