चंद्रपूर : महाशिवरात्रीनिमित्त वैनगंगा आणि वर्धा नदीच्या पात्रात आंघोळीसाठी गेलेल्या तीन सख्ख्या बहिणींसह सहा जणांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (दि.२६) चंद्रपूर जिल्ह्यातील सावली व राजुरा तालुक्यात उघडकीस आली. जिल्ह्यात धार्मिक उत्सव जोरात सुरू असताना ही दुर्दैवी घटना घडल्याने शोककळा पसरली आहे.
चंद्रपूर गडचिरोली राष्ट्रीय महामार्गावरील सावली तालुक्यातील वैनगंगा नदीच्या पुलाखाली आज (बुधवारी) महाशिवरात्री निमित्त चंद्रपुरातील बाबुपेठ येथील मंडल कुटुंबीय आंघोळीसाठी गेले होते. दुपारच्या सुमारास आंघोळीसाठी गेलेल्या प्रतीमा प्रकाश मंडल (वय २३), कविता प्रकाश मंडल (वय २२), लीपीका प्रकाश मंडल (वय १८) ह्या वैनगंगा नदीत आंघोळीसाठी गेल्या होत्या. या दरम्यान पाण्याचा अंदाज न आल्याने तिघींचाही मृत्यू झाला. यावेळी सोबत त्यांचा लहान भाऊ व काकु होत्या. हे पाचही जण बुडत असताना आरडाओरड केली. दरम्यान सोबत असलेल्या काकाने प्रसंगावधान राखुन एका भावास बाहेर काढले. लगेच त्याच्यावर उपचार झाल्याने त्याचा जीव वाचला. सोबत असलेली काकू पाण्याच्या प्रवाहाने वाहत असताना नदीतील दगडाचा घेऊन तब्बल एक तास ती तिथेच अडकून राहिली. तालुक्यातील आपदा दलाच्या मदतीने संबंधीत महीलेला सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. तिघांपैकी एकाचा मृतदेह मिळाला असून दोघांच्या मृतदेहासाठी सावली पोलिसांकडून शोध सुरू आहे.
दुसरी घटना दुपारच्या सुमारास राजुरा तालुक्यातील वर्धा नदीच्या चुनाडा घाटावर घडली. यामध्ये तिघा युवकांचा मृत्यू झाला. वर्धा नदी राजुरा आणि बल्लारपूर तालुक्यांच्या सीमेवरून वाहते. महाशिवरात्री निमित्त गावातील काही लोक नदी घाटावर अंघोळीसाठी गेले होते. यातील ३ युवक नदीच्या दुसऱ्या काठावर आंघोळीसाठी गेले आणि खोल पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला. मृतांमध्ये तुषार शालिक आत्राम (वय १७), मंगेश बंडू चणकापुरे (वय २०) आणि अनिकेत शंकर कोडापे ( वय १८) यांचा समावेश आहे. राजुरा आणि बल्लारपूर पोलीस मिळून नदी पाण्यात मृतदेहांचा शोध घेत आहेत.