राजुरा-गडचांदूर मार्गावर भीषण अपघात; 
चंद्रपूर

Chandrapur Breaking|राजुरा-गडचांदूर मार्गावर भीषण अपघात; सहा ठार, दोन गंभीर

हायवा ट्रकची ऑटोला जोरदार धडक : कापनगाव जवळ अपघात, पाचगाव व परिसरात शोककळा

पुढारी वृत्तसेवा

Chandrapur Breaking | Tragic Accident on Rajura-Gadchandur Road: Six Dead, Two Critical

चंद्रपूर : राजुरा-गडचांदूर मार्गावरील कापनगाव जवळ आज दुपारी झालेल्या भीषण अपघातात सहा जणांचा करुण अंत झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये तिन महिलांचा समावेश आहे. या घटनेमुळे पाचगाव व परिसरात शोककळा पसरली आहे.

राजुरा येथून पाचगावकडे जात असलेल्या एका ऑटोला विरुद्ध दिशेने येणाऱ्या हायवा ट्रकने जबर धडक दिली. दुपारी सुमारे ४ वाजता ही दुर्घटना घडली. या धडकेत तीन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला तर एकाचा राजुरा उपजिल्हा रुग्णालयात आणि आणखी दोन महिलांचा रस्त्यात मृत्यू झाला. गंभीर जखमींमध्ये एकास चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात रेफर करण्यात आले असून दुसऱ्यावर राजुरा येथे उपचार सुरू आहेत.

महामार्गावरील कामामुळे निर्माण झाला संभ्रम

राजुरा शहरापासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर सध्या महामार्गाचे काम सुरू असून वाहतूक वळवण्यात आली होती. मात्र यासाठी कोणतेही सूचना फलक लावले नसल्याने ऑटोचालक संभ्रमात पडला आणि हायवेमध्ये घुसताच हायवाने जोरदार धडक दिली. टक्कर इतकी भीषण होती की संपूर्ण ऑटोचा चुराडा झाला.

या मध्ये सहा जणांना जीव गमवावा लागला. मृतांमध्ये रवींद्र हरी बोबडे (वय ४८) रा . पाचगाव,शंकर कारू पिपरे (वय ५०) रा . कोची,सौ. वर्षा बंडू मांदळे (वय ४१) खामोना, तनु सुभाष पिंपळकर (वय १८) रा. पाचगाव, ताराबाई नानाजी पापुलवार (वय ६०) रा. पाचगाव व

प्रकाश मेश्राम (वय ५०) ऑटोचालक, पाचगाव आदींचा समावेश आहे. तर  जखमींमध्ये निर्मला रावजी झाडे (वय ५०)  रा . पाचगाव आणि  भोजराज महादेव कोडापे (वय ४०) रा भुरकुंडा – राजुरा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू) यांचा समावेश आहे.

घटनास्थळी पोलिसांचा तातडीने हस्तक्षेप

अपघातानंतर राजुरा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ट्रक पोलिसांनी जप्त केला असून चालक फरार आहे. या घटनेनंतर आमदार देवराव भोंगळे यांनी रुग्णालयात भेट देऊन जखमींची विचारपूस केली. ठाणेदार सुमित परतेकी, सहायक पोलिस निरीक्षक हेमंत पवार व सहकारी पुढील तपास करीत आहेत.

जनतेचा संताप उसळला

अपघातात सहा जणांचा मृत्यू झाल्याने परिसरात मोठा आक्रोश उसळला आहे. महामार्गाचे काम करीत असलेल्या कंपनी व संबंधित अधिकाऱ्यांवर जबाबदारी टाकण्याची मागणी नागरिकांनी केली. रुग्णालयात नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. परिस्थिती तणावपूर्ण झाल्याने दंगा नियंत्रण पथकाला देखील बोलावावे लागले. सध्या परिसरात तणावपूर्ण शांतता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT