चंद्रपूर : आगामी श्री गणेश उत्सव व विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, तसेच सामाजिक सलोखा कायम रहावा यासाठी जिल्हा पोलीस प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता-२०२३ च्या कलम १६३ (२) नुसार जिल्ह्यातील वेगवेगळ्या पोलिस स्टेशन हद्दीतील ५४० इसमांविरुद्ध हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे. ५४० लोकांना पोलिस स्टेशन हद्दीत येण्यास या आदेशाने मनाई करण्यात आली आहे.
भारताची राज्यघटना सर्वधर्म समभाव व धर्मनिरपेक्षतेचा मूलभूत संदेश देते. मात्र काही समाजविघातक प्रवृत्ती या तत्त्वांना तिलांजली देत अराजकतेचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. अशा प्रवृत्तीवर नियंत्रण ठेवणे, तसेच सण-उत्सव शांततेत व उत्साहाने साजरे व्हावेत यासाठी ही कार्यवाही करण्यात आल्याचे जिल्हा पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री. मुम्मका सुदर्शन व अपर पोलीस अधीक्षक श्री. ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली पोलीस स्टेशन प्रभारी अधिकाऱ्यांनी आपल्या-आपल्या हद्दीतील शांतता भंग करणाऱ्या व्यक्तींची यादी तयार करून प्रस्ताव सादर केला. त्यानंतर संबंधित उपविभागीय अधिकाऱ्यांच्या कार्यालयातून आदेश पारित होऊन ही हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे.