Gadchandur Municipal Council Drinking Water Problem
चंद्रपूर : सप्टेंबरचा पहिला आठवडा संपत आला असतानाही चंद्रपूर जिल्ह्यात अपेक्षित पाऊस झालेला नाही. जिल्ह्यात आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या केवळ ५०.३ टक्के पावसाची नोंद झाली आहे. कमी पावसाचा थेट परिणाम सिंचन प्रकल्पांच्या पाणीपातळीवर होत असून, गडचांदूर शहरालगतच्या अमलनाला धरणातील पाणीसाठाही कमी होत आहे. संभाव्य पाणीटंचाईचे संकट लक्षात घेऊन कोरपना तालुक्यातील गडचांदूर नगरपरिषदेने मोठा निर्णय घेतला असून, नगरपरिषद इमारतीच्या बांधकामासाठी प्राप्त झालेला ९१ लाख रुपयांचा निधी आपत्कालीन पाणीटंचाईच्या कामांसाठी राखीव ठेवला आहे.
अमलनाला धरणातून सुमारे ५० हजार लोकसंख्या असलेल्या गडचांदूर शहरासह आजूबाजूच्या २४ गावांना पाणीपुरवठा केला जातो. याशिवाय अंबुजा आणि अल्ट्राटेक या सिमेंट उद्योगांसह रब्बी हंगामातील शेतीसाठीही या धरणाच्या पाण्यावर मोठ्या प्रमाणात अवलंबून राहावे लागते. त्यामुळे धरणातील पाणीसाठा कमी झाल्यास त्याचा परिणाम पिण्याच्या पाण्यासह उद्योग आणि शेतीवरही होण्याची शक्यता आहे.
ही संभाव्य परिस्थिती लक्षात घेऊन नगरपरिषदेने नगरपरिषद इमारतीच्या बांधकामासाठी आलेला ९१ लाख रुपयांचा निधी सध्या खर्च न करता राखीव ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. भविष्यात पाणीटंचाई निर्माण झाल्यास आवश्यक त्या आपत्कालीन उपाययोजनांसाठी या निधीचा उपयोग केला जाणार आहे.
दरम्यान, अमलनाला धरणातील पाणी पिण्यासाठी आरक्षित करण्याची मागणीही प्रशासनाकडे करण्यात आली आहे. नगराध्यक्षांच्या उपस्थितीत झालेल्या या निर्णयाचे नागरिकांकडून स्वागत करण्यात येत आहे. संभाव्य पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी नगरपरिषदेने आतापासूनच नियोजन सुरू केल्याने भविष्यातील संकटाला सामोरे जाण्यास मदत होणार असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
नगरपरिषदेच्या इमारतीसाठी आलेला ९१ लाख रुपयांचा निधी पाणीटंचाईचे संकट लक्षात घेता राखीव ठेवण्यात आला आहे. तसेच धरणाचे पाणी पिण्यासाठी आरक्षित करण्याची मागणी प्रशासनाकडे करण्यात आली आहे.- निलेश ताजणे, नगराध्यक्ष, गडचांदूर नगरपरिषद