चंद्रपूर : ब्रह्मपुरी तालुक्यातील मेंडकी लगतच्या जवराबोडी मेंढा जंगलात एका शेतकऱ्यावर वाघाने हल्ला करून क्रुरपणे ठार केल्याची घटना समोर आली. ही थरारक घटना सोमवारी (दि.१०) सकाळी उघडकीस आली.
शेतकरी सिंधी तोडण्यासाठी जंगलात गेला होता. रात्रीपर्यंत घरी न परतल्याने कुटुंबीय व गावकऱ्यांनी शोध घेतला असता जंगात त्याचे अवयव वेगवेगळ्या ठिकाणी विखुरलेले अवस्थेत सापडले. भास्कर गोविंदा गजभिये (वय 62) रा. मेंडकी असे मृतक शेतकऱ्याचे नाव आहे. या घटनेने प्रचंड दहशत निर्माण झाली आहे.
ब्रह्मपुरी तालुक्यातील मेंडकी येथील अल्पभूधारक शेतकरी भास्कर गोविंदा गजभिये हा काल रविवारी मेंडकीपासून जवळ असलेल्या जवराबोडी-मेंढा जंगलात सिंदी तोडण्यासाठी एकटाच गेला होता. शेतीत धानाची लागवड करण्यात आल्याने स्वत:च शेतातील धानाचे भारे बांधण्यासाठी सिंदीची गरज होती त्यामुळे तो गेला होता. रविवारची सायंकाळ होऊनही गजभिये घरी परत आला नाही. कुटुंबीय वाट पाहत राहिले, पण तो काही आला नाही. रात्री उशिरापर्यंत तो घरी न पोहोचल्याने कुटुंबीय चिंताग्रस्त झाले.
आज सोमवारी (दि.१०) सकाळी कुटुंबीय व गावकरी मिळून जवराबोडी मेंढा परिसरातील जंगलात शोधासाठी गेले. शोध घेत असताना एका ठिकाणी त्याची सायकल व बाजूला सिंदी पडलेली आढळून आली. थोडे पुढे गेल्यावर कुटूंबिय व गावकऱ्यांना अत्यंत भीषण दृश्य दिसले. काही अंतरावर शरीराचे अवयव वेगवेगळ्या ठिकाणी विखुरलेले अवस्थेत आढळले. काहींनी तत्काळ ही माहिती मेंडकी ग्रामस्थांना दिली. वनविभाग व पोलिसांनाही कळविण्यात आले. नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. वनपरिक्षेत्र अधिकारी (मेंडकी) तसेच पोलिसही घटनास्थळी पोहचले. शरीराचे अवयव एका ठिकाणी गोळा करण्यात आले त्या नंतर पंचनामा करून पार्थीक ब्रह्मपुरी येथे शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला.
गेल्या पंधरा दिवसांपासून या परिसरात वाघाचे दर्शन होत असून काही जनावरे ठार केल्याच्या घटना ताज्या आहेत. तरीदेखील वनविभागाने बंदोबस्ताची कोणतीही ठोस उपाययोजना केली नाही, अखेर आज सदर शेतकररी त्याच परिसरात सिंदी आणण्याकरीता गेला असता तो वाघाच्या हल्यात बळी ठरला. वाघाने क्रुरपणे त्याचा जिव घेतल्याने परिसरात प्रचंड दहशत पसरली आहे. भास्कर गजभिये यांच्या पश्चात मुलगा, सून आणि नातू असा परिवार आहे. दोन वर्षांपूर्वी पत्नीचा अपघातात मृत्यू झाला होता तर वर्षभरापूर्वी एका मुलाचे निधन झाले होते. घरातील प्रमुख कमावता हात गेल्याने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
या घटनेमुळे मेंडकी व जवराबोडी मेंढा परिसरातील नागरिकांमध्ये प्रचंड दहशत पसरली आहे. नागरिकांनी वाघाचा तात्काळ बंदोबस्त करावा, मृतकाच्या कुटुंबीयांना भरघोस आर्थिक मदत द्यावी, जंगलात नियमित गस्त वाढवावी अशी मागणी केली आहे. वारंवार वाघाची दहशत निर्माण झाली असतानाही वनविभाग ठोस पाऊले उचलत नाही त्यामुळे त्याच्यावर निष्क्रियतेचा आरोप गावकऱ्यांकडून करण्यात येत आहे.